Monday, February 11, 2013

त्रिशुंड गणपती : श्री. उदयन इंदुरकर



काही अद्भुत ठेवा आपल्या पुण्यात, आपल्या हाकेच्या अंतरावरच्या परिसरात आहे...हे आज  नव्याने उलगडल. आजचा दिवस मी ठरवलं तरी विसरू शकणार नाही.  
तीन चार आठवड्यांपूर्वी दैनंदिनीच्या कामानिम्मित्त आपल्या वर्गावर व्याखानाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या  श्री. इंदुरकर सर  ह्यांच्याशी भेट झाली, यंदाच्या दैनंदिनीचा प्राचीन ६४ कलांचा विषय असण, त्यात मुखपृष्ठावरील त्रीशुन्ड्या  गणपतीच्या मंदिराच  चित्र असण, आणि  त्यावर सरांची एकच प्रतिक्रिया येण  , ' खूप काही बोलकी कलाकृती निवडली आहे तुम्ही मुखपृष्ठासाठी '  ... आम्हाला मात्र ह्या कलाकृती विषयी निवडक माहिती होती... पण सरांची तर  अभ्यासपूर्ण प्रतिक्रया... मग उत्सुकता जागली आणि सहज विचारलं... सांगाल का आम्हाला अजून ह्या विषयी? ... अधिक माहिती ऐकायला आवडेल आम्हाला...त्यावर सरांचा उत्स्फूर्त होकार ...   बस... ठरलं...सोमवार पेठेतील त्रीशुण्डया  गणपतीच्या मंदिराची इंदुरकर सरांबरोबरची भेट ! १० फेब्रुवारी सकाळी ८.३०, मोहीम त्रीशुण्डया गणपती ! दोन आठवड्यांपूर्वी वर्गावर जाहीर केल, आपण दैनंदिनीच्या निम्मित्ताने त्रिशुंड गणपतीचे जे मुखपृष्ठ घेतले आहे त्या साठी आपण त्रिशुंड गणपतीला जाणार आहोत, साऱ्या संचालकांनी, प्रशिक्षकांनी,  विद्यार्थ्यांनी पण कल्पना उचलून धरली, आपल्या रोजच्या दैनंदिनीच्या मुख्पृष्ठावर असलेल चित्र आहे तरी कोणत्या मंदिराच? आणि विशेष काय आहे त्यात .... उत्सुकता दोन रविवारमध्ये वाढली आणि छोटीशी सहल निघाली! 

आम्ही काही मोजके प्रशिक्षक येणाऱ्या  पाहुण्यांचं स्वागत  आणि स्वागत रांगोळी काढायला पुढे गेलो, वर्ग ८ वाजताच सुटला आणि वर्गावरील १७० विद्यार्थी दुचाकीवरून काही चारचाकीतून थेट त्रिशुंड गणपतीला ... रस्त्यावरून येताना  एखादी rally वगेरेच निघाली आहे अस वाटत होत .... वर्गाची ही एकी बघून सरांनीही बोलून दाखवलं हा पहिलाच असा वर्ग असेल ज्याचे एवढे विद्यार्थी अश्या एखाद्या स्थळाला भेट द्यायला आले असतील... गणपती पायघडी व्यतिरिक्त अस रस्त्यावर एवढ्या मोठ्या संख्येने उतरण्याचा हा पहिलाच प्रयत्न ......

गणेश जयंती चार दिवसांवरच आलेली असताना हा योग इतका छान जुळून आला की त्रिशुंड गणपतीचा सभामंडप भाविकांनी भरून गेला ... सरांची ओळख झाली आणि विवेचनाला सुरवात झाली... 
Trishund Ganpati Photo - Trishund Ganpati, Pune, India

साधारण २५० वर्षांपूर्वी म्हणजे पेशवेकाळात जेव्हा आपली संस्कृती टिकवली जात होती तेव्हा ह्या मंदिराची स्थापना झाली पेशव्यांनी जी प्राचीन शिल्पकला, किंवा मंदिर बांधण्याची कला लुप्त होत चालली आहे त्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून हे मंदिर बांधण्यास घेतले, आपल्या दैनंदिनीचा नेमका 'प्राचीन लुप्त कलांवर प्रकाशझोत' टाकण्याचा प्रयत्न सांकेतिकपणे सुचवणार हे चित्र मुख पृष्ठावर अचूक असल्याच जाणवलं.  
हे मंदिर संपूर्ण दगडात बांधलेलं असून भिमगिरी स्वामी, म्हणजे ह्या मंदिराचे स्थापनकर्ते ह्यांचा मठ, समाधी आणि त्रिशुंड गणपती ह्या तिन्ही गोष्टी एकाच वास्तुत असल्याच सुरवातीला सांगून सरांनी मंदिराच्या छोट्या छोट्या शिल्पकलांबद्दल अधिक माहितीस प्रारंभ केला,   
हे मंदिर सुरवातीला शिवाच मंदिर म्हणून बांधण्यास सुरवात केल्यामुळे ह्या मंदिरातील अनेक ठिकाणच्या शिल्पकलांवर शिवाच्या देवळात वापरल्या जातात तश्या काही विशेष धाटणीच्या शिल्पांची निर्मिती ह्या मंदिरात दिसते, 
मंदिरावर दिमाखात  उठून दिसणारी ललाटपट्टी , त्यावरच ललाटबिंब आणि त्यावरचा त्रिशुंड गणपती , सर म्हणाले ललाटबिंबावर मुळच्या गाभार्यातील देवतेचीच प्रतिकृती लावण्याचा प्रघाद होता,  आणि ह्या गणपतीच्या प्रतीकृतीमुळे इतर मंदिरातही आधुनिक काळात गणपतीच आढळून येतो आणि त्यालाच गणपती पट्टी असेही म्हणतात. 
अनेक गोष्टी आपल्या मंदिरातून दाखवाव्यात अस साहजिकच वाटत असल्याने घरापुढे जशी रांगोळी काढतात त्याचा नेमका वापर येथे सुशोभन करण्यास केला आहे. द्वारासामोराचा उंबरठा ज्याला 'चंद्र्शीला' म्हणतात त्यावरही केलेली कलाकुसर फारच लोभस आहे.
 द्वाराच्या दोन बाजूला जय विजय असून वर दोन हत्ती आहेत, त्यांच्या मुखातून एक तोरण निघते ज्याचे दुसरे टोक एका देवीवर आहे...  ही देवी म्हणूनच गजांत लक्ष्मी म्हणूनही ओळखली जाते... ह्याच्या बाजूला विविध संमिश्र प्राणी आहेत ज्यांना 'व्याध' म्हणतात, जसे तोंड हत्तीचे, देह सिंहाचा तो गजव्याध म्हणजे मुख असणाऱ्या प्राण्याच्या नावाने ओळखला जातो. ह्या मागे कमीत कमी  जागेत विविध कलाकृतींचा अविष्कार करणे अशी मानसिकता कलाकाराची असते.   ह्या शिल्पावर मोर, पोपट असे अनेक प्राणी दिसून येतात, मात्र गजांत लक्ष्मीच्या बरोबर वरती चढत वर जाणारी माकडे कोरली आहेत. ही माकडे मात्र प्राचीन काळात आधुनिक कलेच्या दृष्टीने केलेले बदल आहेत अस सर म्हणाले. सगळ्यात वर शेषधारी म्हणजे शेष नागावर चक्क झोपलेला विष्णू दाखवला आहे. त्यावर काळानुरूप कळसाची रिक्त झालेली जागा दिसते... 
बाजूलाच आठ दिशांचे रक्षक म्हणजेच दिकपाल कोरले आहेत, 

चार पुढे आलेले खांब आहेत त्यावर कीचक उलटे लटकताना दिसतात, त्यांच्या हातात साखळ्या दिसतात त्यावर मंदिराचे छत आहे... हे छत त्यांनी उचलून धरले आहे... म्हणजेच छत मंदिरावर टेकलेले नाही... मधली मोकळी जागा अवकाश दर्शवते... काय कल्पना आहे बघा... अवकाश दाखवूनही न दिसणारी म्हणजे अव्यक्त गोष्ट..एक निर्वात पोकळी अश्या 'व्यक्त' माध्यमातून साकारायची...अचाट कल्पना...  कलाकारांना दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.. 


मात्र ह्या मंदिरामध्ये अतिशय नोंद घ्यावी अस काही असेल तर खाली कोरलेली त्यावेळचे सामाजिक भान ठेवणारी सूचक गोष्ट ! त्या काळात इंग्रजांचे राज्य भारतावर होते, त्यांनी तेव्हा आसामच्या राजाला पकडलं होत, आसामच प्रतिक म्हणजे गेंडा त्याला साखळदंडांनी बांधून घेऊन जाणारे इंग्रज बाजूला दिसत आहेत...
 

खाली दिसत असलेले हत्ती आपापसात जुंपत आहेत... असेच भांडत राहिलात तर इंग्रजांना तुमच्यावर जय मिळवणे सहज शक्य आहे असा संदेश मार्मिक पणे  त्याकाळच्या समाजाला कलाकारांनी दिला आहे. 

आत गेल्यावर बऱ्यापैकी मोठे सभा मंडप आहे, सभामंडपाची रचना आणि वरचा घुमट पाहण्यासारखा आहे, खाली विष्णूचा द्वितीय अवतार म्हणजेच कूर्म कोरला आहे, त्या भोवती तैल रंगांनी रंगवून  रांगोळी काढली आहे,  
हा सभामंडप विवध कलाकारांना आपली कला देवापुढे सादर करण्यासाठी असलेल हक्काच व्यासपीठ ! 
पुन्हा सभामंडपातून आत जात असताना द्वारावर जय विजय, गजान्तलक्ष्मी कोरलेले दिसतात, अजून थोडी मोकळी जागा सोडून मग आता गर्भगृह आहे, गर्भगृहाच्या मध्यभागी मोरावर विराजमान असा त्रिशुंड गणपती, 
हा गणपती उच्छित गणेश म्हणून संबोधलं जातो. गणपतीच्या डाव्या मांडीवर रिद्धी बसलेली आहे. मानवातल्या कामभावना देवातांमध्येही असल्याचे सुचवणारा हा गणपती हठयोगी लोकांकडूनच पुजला जातो. 



 


मंदिराच्या डाव्या बाजूला नटेश्वराची फार छान मूर्ती कोरली आहे, 


ह्या नटेश्वराच्या प्रत्येक कृती मागे मोठे तत्वज्ञान आहे, त्यात लपलेले विज्ञान पाहून आजही अचंबित व्हायला होते... 
ह्या नटेश्वराखाली अपस्मार नावाचा बुटका पुरुष आहे, हा बुटका पुरुष वाईट प्रवृत्तींच प्रतिक मनाला असून त्याचा नाश नटेश्वराकडून नक्की असल्याचे हे ही मूर्ती सुचवते, त्याचा डावा पाय उचलेला असून तो मोह मायेला दर्शवतो मात्र, ज्यांना मोक्ष हवा असेल त्यांना तो माझ्याकडून मिळेल असे आश्वासन त्या पायाकडे दर्शवल्या हातातून दिसते. बाजूला असलेली विश्वाची सीमारेषा नटेश्वरानी स्पर्शली आहे तेथे पंचमहाभूतांनी हे विश्व बनलेले आहे असे सूचकपणे कोरलेले दिसते,  
देवळाच्या पाठीमागे लिंगोद्भवाची छानशी मूर्ती आहे.
 

ह्यात शंकर अव्यक्त रुपात म्हणजे पिंड रुपात आहेत, एकदा अग्निरूपी काळाचा आदि आणि अंत शोधण्यासाठी गेलेले  ब्रह्मा आणि विष्णू  कलाकारांनी विश्णु मूषक रुपात , म्हणजे उंदराच्या रुपात  तर ब्रह्माला हंसाच्या  रूपात दाखवले आहे. मात्र त्यांचा यत्न अखेर आदिदेव शंकरापाशी येउन थांबला अस ह्या मागची पुराणकथा सांगते. अणु म्हणजे शिव आणि त्याचे शक्तीत रुपांतर म्हणजे ज्वाला हे शिवशक्तीचे प्रतीकात्मक रूप असल्याचे जाणवते.   इतक्या विचारांती साकारलेल्या ह्या कलाकृती बघताना थक्क व्हायला होते. 
अवकाश म्हणजे शिव तर वेळ किंवा काळ म्हणजे विष्णू अश्या दोन देवतांचे पूजक समाजात वेगवेगळे होते शिवभक्त आणि वैष्णव म्हणजे विष्णू भक्त ,  मात्र सगळे देव समानच आहेत, आणि असा देवांच्या पुअनवरुन भेदभाव समाजात होऊ नये ह्यासाठी मंदिराच्या उजव्या बाजूला हरी-हराची मूर्ती आहे,  

म्हणजे शिवभक्तांना वाटते आपण शिवापुढे नतमस्तक आहोत पण आपोआप हात विष्णूपुढे जोडले जातात आणि वैष्णवांना वाटत आपला देव श्रेष्ठ मात्र ते शिवापुढे अजाणते पाणी माथा टेकतात.  काय बोलके भाव आणि विचार आहेत कलाकाराचे... 

असे एक न अनेक अर्थ इंदुरकर सरांबरोबर समजून घेत असताना खूपच छान वाटल... मग प्रश्नोत्तरातून शंकांचं निरसन झाल...
हे मंदिर सुरवातीला  बांधताना शिवाच मंदिर म्हणून बांधण्यास सुरवात केलेली होती तसा उल्लेखही जवळील फलकावर केलेला आहे नेमक्या त्याच भावनेने शिव-शक्ती कलेची देवता अस आणि कलांचा उगम मंदिरात झाला असे धागे दोरे साहित्यात सापडल्याने एक कलेच उगमस्थान दाखवणार प्रतिक म्हणून  ह्याच मंदिराची मुख पृष्ठासाठी निवड केली गेली होती....  मात्र हे अजून बारकावे समजल्यावर आणखीन समाधान लाभल, 
ह्या वर्षीच्या दैनंदिनीच्या निम्मित्तानी आपल्या पुण्याच्या संस्कृतीचा, कलेचा ठेवा  रसग्रहित करता आला 
हा ठेवा स्मरणात राहावा म्हणून मुद्दाम शब्दबद्ध करावासा वाटला, ज्यांच्या पर्यंत हा पोहचला नाही त्यांच्या पर्यंत पोहाचावासा वाटला म्हणून केलेला हा छोटासा यत्न!


तेजश्री 
१०.०२.२०१३ 

Wednesday, June 6, 2012

पर्यावरण प्रेमींनो... दिवसाचे ढोंग कशापायी?


५ जून जागतिक पर्यावरण दिन सगळीकडे एकच नारा झाडे लावा झाडे जगवा.. काहींनी मोफत रोपे वाटली, मग कुठे पशुपक्षांवर प्रेम करा, नाहीतर कुठे प्रदूषण टाळा, प्लास्टिकचा वापर टाळा, कॅरीब्यागला नाही म्हणा अश्या घोषणा! अरे पण पर्यावरण प्रेमींनो हे सगळ लाख टक्के खर असल तरी नुसत्या घोषणा देऊन काय होणारे? हे आचरणात कधी येणार? हे असल बिनबुडाच दिवसाच ढोंग कशापायी? 
पर्यावरण प्रेमींनो एका दिवसापुरती झाडं लावून जितक पुण्य तुम्ही कमवू इच्छिता (अर्थात माझ्या मते हे फक्त लोकप्रसिद्धी आणि मत मिळवण्याचे कारभार आहेत) तेवढ तुम्ही ते वर्षभर ती लावलेली झाडे न जगवून गमावता; खरतर त्याच पापच लागत असेल...  ह्या फुकटची रोपटी जमिनीत खोवण्याच्या विवीध पोझ देणाऱ्या झुट्या आशिकांच्या घरी किती झाडं आजतागायत लावली असतील? किती जागवली असतील? लावलीही असतील पण त्यांच्या कडे स्वतः कितींनी लक्ष दिले असेल? की चार पैसे फेकले असतील? इथे ते प्रेम कुठे जात म? लोका शिकवावे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण...  म्हणजे अगदी कालच वटपोर्णिमा झाली हाच पती सात जन्म मिळावा म्हणून किती फांद्या तोडल्या गेल्या वडाच्या ?  (आजकालच्या नविन संकल्पने प्रमाणे वडाच्या फांद्या घरात आणून पूजा करण्याची प्रथा आहे... त्यानी दूर वडापर्यंत जावे लागत नाही.. गर्दी गोंगाट टाळतो...)  हीच कथा दसर्याची...... सोने लुट नावाच्या पूर्वजांच्या आशेची अपेक्षांची चक्क नासाडी करताना कुठे जाते हे प्रेम? ह्याला पर्याय का नाही शोधले जात ? 
तीच गोष्ट प्रदूषणाची.... हवेच्या प्रदुषणा बद्दल तर बोलायलाच नको ध्वनी प्रदूषणाचा तर आनंदी आनंदच आहे आज काल वाट्टेल ते कारण शोधून धांगडधिंगा करण्याची खोडच आहे.. आणि सगळ्यात  हसू तर त्या दिवशी आल जेव्हा मी वर्तमानपत्रात वाचलं दोन चिमुकल्यांवर पखवाज वाजण्याची बंदी केली का तर म्हणे ध्वनी प्रदूषण होते... अपुर्या ज्ञानापायी चुकीच्याच गोष्टींना विरोध करण्याची जणू प्रथाच आहे.. पखवाजाने जर ध्वनी प्रद्षण होत असेल तर त्या ध्वनी प्रक्षेपकाच्या चळती त्या विघ्नहर्त्या समोर लावलेल्या असतात तेव्हा हा कायदा कुठे जातो? डोळे बांधलेल्या न्यायदेवतेचा अश्यावेळी राग आल्यावाचून राहील का? 
अशी विरोधाभासी गोष्ट प्लास्टिक वापराबाबत ... केली आणायला गेलं मग कॅरीब्याग, कपडे खरेदीला गेलं हक्काची मागणी...तीच गोष्ट किराणा मालाची, रोजच्या जीवनावश्यक गोष्टीची, भाजीपाल्याची सगळ काही त्या प्लास्टिक मध्ये कोंबल्याशिवाय घरीच येत नाही ... एकदा मी माझ्या भाची साठी फ्रॉक खरेदीला गेले, तेव्हा मी प्लास्टिक कॅरी ब्याग देऊ नका म्हणून सांगितलं तर ती काउंटरवरची सुंदरी मझ्याकड बघतच राहिली अश्या काही अचंबितपणे की मला वाटल मी काही चूक केली..पुढे मला विचारते अहो म तुम्ही तो बॉक्स घरी कसा नेणार..मी जेव्हा म्हणल माझ्याकडे कापडी पिशवी आहे तरी तिने तिचा हट्ट सोडला नाही... म्हणजे मुळात आपल्या दुकानाची प्रसिद्धी व्हावी हा हेतू त्यामागे लपलेला असेल तर प्लास्टिक वापर टाळण्यासाठी आपण पाऊले कशी उचलणार ? 
६ R  नियमाप्रमाणे Refuse (नाकारा) , Reuse (पुनःवापर), recycle (पुनः श्चक्रण) , remind  (लक्षात ठेवा )  repair (दुरुस्त करा), respect (आदर करा) हे सहा नियम योग्य प्रकारे वापरले गेले तर वसुंधरेच हरवलेलं सौंदर्य परत लवकरच मिळेल. 
हो पण पर्यावरण दिनाच्या दिवशी नारे द्यावेत, जनजागृती करावी, ह्यावर माझा आक्षेप नसून फक्त त्या दिवसापुरताच ते मर्यादित नसावं... पर्यावरण प्रेमींनो प्रेम करायचं तर जन्मभर करा एकनिष्ठ राहा .... एका दिवसाचं ढोंग कशाला? 

तेजश्री
६.६.२०१२       

Thursday, May 10, 2012

ग्रीष्म


वेडी वाकडी वळण घेत, कधी उड्या मारत, कधी संथपणे, कधी अरुंद पोकळीतून जागा काढत तर कधी राजरोस पणे पाय पसरून नजरेत बसेल एवढा परिसर कब्जात घेऊन जाणारी ती नदी असंख्य जीवांना आश्रय देत होती. रंगीबेरंगी मासे, कासवे, सुसरी, मगरी, लव्हाळी, कमळे, झालंच तर घटपर्णी आदि जीव अगदी मजेने राहत. बगळे, पाणबगळे, पोंड हेरॉन, खंड्या, बंड्या, पाकोळ्या, वेडा राघू, टीबुकल्या, वारकरी बदक, सी इगल, आणि कर्कश्य ओरडून शत्रूची उपस्थिती अवघ्या परिसरातील पक्षांना करून देणाऱ्या टिटव्या, आणि इतर असंख्य पक्षी अगदी मजेत राहत  होते. 
वसंत सरला आणि ग्रीष्माने घामाच्या धारा काढायला सुरवात केली, कुठे सावलीला ढग येई आशा लावे आणि तसाच निघून जाई. नदीकिनार्यावरच्या गुलमोहराने लाल चुटूक शेला पांघरला होता, पान गाळून फक्त फुलांनी झाडाला नटवले होते, जवळचा पांगाराही वाऱ्यासंगे ठुमकत होता, पिवळ्या धमक लडी लडिवाळ पणे पुढे मागे करत, ऐन तारुण्यात आलेला पांगारा खुलला होता. पोक्त पिंपळ, गुलमोहोर, पांगारा, पळस, नीलमोहोर ह्यांच्यात सौंदर्याची स्पर्धा चालली होती, प्रत्येक जण आपल रूप नदीत बघून भारी खुश होत होता. ग्रीष्माची धगधगता वातावरणात होतीच आणि ती गुलमोहोर, पांगारा, पळसाच्या मध्ये शोषली जात  होती म्हणूनच कदाचित इतके आकर्षक रंग आले होते, पण सारेच एवढे थोर की आश्रयास आलेल्यास मात्र केवळ शीतल छायाच मिळे, उन्हाची एक झळही पांथरास बसत नसे. 
नदीच पाणी आटू लागल होत, पाण्याची पातळी चांगलीच खाली गेली होती.  दुरून आश्रयास आलेले पशु पक्षी झाडांवर गर्दी करत होते, प्यायला पाणी, राहायला निवारा आणि खायला अन्न सारच तोकड पडत होत, काही निराश होऊन पंखात पुरेस बळ नसताना पुढच्या प्रवासास निघत, थकत, दमत, विश्रांती घेत, चार मिळतील तेवढे घास पोटात ढकलत आणि पुढे जात. पण त्यांच्या त्यांच्यात कसली चढाओढ  नव्हती, एकमेकांवर रोष नव्हता, उलट निसर्गाचे पांग ते एकजुटीने आनंदात फेडत होते, त्यांची देहबोली आनंदी, उस्ताही, आशादायी होती. ते भाग्याला दोष देत बसत नव्हते.  निसर्गातून शिकायला बरच काही मिळाल. ग्रीष्मान नवं चैतन्य निर्माण केल .....



तेजश्री 
१०.०५.२०१२ 

Sunday, November 13, 2011

मुलाखत श्रीमती ज्योती मुंगसे


                'हृदयज्योत' संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा श्रीमती ज्योती मुंगसे ह्यांना सुद्धा जन्मजात हृदयदोष आहे. हृदयदोष असणाऱ्या  मुलांना व पालकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा स्वानुभव आल्यामुळे ह्या संस्थेची स्थापना ३ जून २००४ मध्ये करण्यात आली. मुख्यतः हृदयदोष असणाऱ्या मुलांच्या पालकांना समुपदेशनामार्फत मानसिक आधार दिला जातो तसेच हृदय शस्त्रक्रियेसाठीच्या निधी संकलनाबाबत आवश्यक ती माहिती पुरवली जाते व शस्त्रक्रिया होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन दिले जाते.  ज्योती ताईंशी बोलताना हळूहळू उलगडा झाला की निसर्गाने विविध  हृदयदोष, फुफुसदोष एकाच वेळी देऊन ताईंची जणू सत्वपरीक्षाच घेतली त्यातून त्यांनी जिद्दीने दिलेला जीवनलढा खूपच स्फूर्तीदायी आहे. 
              'हृदयज्योत' संस्थेची स्थापना करण्यामागची कारणं सांगताना ज्योतीताई म्हणाल्या, मैत्रिणीच्या साधर्म्य असणाऱ्या अशाच हृदयदोषात जीव तोडून केलेले प्रयत्न शेवटी अपुरे पडले आणि शस्त्रक्रीयेआधीच ती दगावली तो सर्वात पहिला घाव होता, त्यातून एक अपराधीपणाची भावना आली. पुढे स्वतःच्या आयुष्यातही जगण्यासाठी बराच झगडा करावा लागत होता. जीवनातील मजा अनुभवताना त्रासही तितकाच होत होता, थोडीदेखील दगदग सहन व्हायची नाही, कॉलेजमध्ये असताना दोन तास दांडीया खेळल्याच मोल त्यांना सहा महिने पलंगावर काढून मोजाव लागल शिवाय कॉलेज सुटल ते निराळच.  त्यानंतर पार्लर, पाळणाघर चालवणे ह्या सारखे बारीक सारीक उद्योगही ताईंनी केले. मनातली जिद्द कायम होती त्यामुळे त्यांनी अर्धवट राहिलेलं 'बीए'चं शिक्षण पूर्ण केल पुढे एमएला देखील प्रवेश घेतला मात्र तेव्हा शरीरानी म्हणावी तितकी साथ दिली नाही शिक्षण पुन्हा सुटल अडीच वर्ष पलंगावर काढावी लागली, सवंगडी आपापल्या व्यापात, अश्या आजारात कुणी जवाबदारी घेणंही अवघडच, कुठे जाण येण नाही, दिवसरात्र पलंगावरच काढायची, असं झगडत आयुष्य काढावं लागतंय ह्यामागच देवाचं प्रयोजनही समजत नव्हत. पण ह्या काळात एक विरंगुळा होता तो पुस्तकांचा! वाचनाची आवड असल्याने ज्योती ताई ह्या काळात खुप वाचत राहायच्या, ह्याच दरम्यान वाचनात आलेल 'चाकाची खुर्ची' हे नसीमा तस्लीम हुरजूक ह्यांच पुस्तक खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान बनल आणि आपल्यासारख्याच हृदयदोष असणाऱ्या मुलांसाठी आपण काहीतरी कराव ही कल्पना प्रबळ होत गेली. स्वतः पलंगावर असताना हे कस काय करणार ह्या विचारात सुरवात म्हणून  स्वतःवर एक लेख त्यानी 'सकाळ' साठी लिहिला त्यात अश्या रुग्णांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्त्यातून असंख्य फोन, पत्र आली. सुरवातीला लोकांनी त्यांच्यासमोर सांसारिक प्रश्नांपासून अगदी कर्करोग, एडस सारख्या समस्या मांडल्या पण मग पुढे त्यातून हृदयदोष ह्यावरच लक्ष नियंत्रित करून ताईंनी 'हृदयज्योत' नावाची संस्था स्थापन केली. 
                'हृदयज्योत' संस्थेच काम थोडक्यात सांगताना त्यांनी नमूद केल, सुरवातीला हृदयदोषाच्या रुग्णांना मानसिक आधार देतात व त्यांचे समुपदेशन करतात.  त्याबरोबर कोणत्या संस्था ह्या रोग्यांसाठी मदत करतात त्यांच्या कडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा ह्याच मार्गदर्शन करतात. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सोई लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि एकंदरच ह्या व्याधीविषयी जनजागृती करण्यासाठी खेडोपाडी जाऊन ताईंनी व्याख्याने दिली, व तीन वर्ष समुपदेशन केंद्र चालवले 
                हृदयदोष असणाऱ्या चिमुरड्यांच्या पालकांना त्यांनी योग्य वयात निदान झाल्यावर औषधोपचार, गरज भासल्यास शस्त्रक्रिया, अविलंब करण्याचा संदेश दिला. 
                हृदयदोषावर जनजागृतीकरणारा 'हृदयाची गोष्ट' नावाचा माहितीपट नुकताच सप्टेम्बर ०११ मध्ये त्यांनी प्रदर्शित केला असून आगामी दिवसात हा माहितीपट राष्ट्रीयपुरस्कारासाठी पाठवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 'हृदयज्योत' नावाची ह्या हृदयदोषावरील पुस्तिका त्यांनी २००८ मध्ये प्रकाशित केली आहे. हृदयदोषावरील सविस्तर माहिती, निदानपद्धती, उपचारपद्धती, सरकारी मदतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहितीही ह्यात पुरवली आहे. 
              सरकारने जरी हृदय शस्त्रक्रियेसाठी  विवीध योजना राबवल्या असल्या तरी सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रीयेनंतर लागणाऱ्या उपकरणांची सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेक दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना खाजगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे पर्यायाने सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीचा फायदा त्यांना होतच नाही ह्या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली 
                शारीरिक अडचणीमुळे गाणं, नाच किंवा रांगोळीची कला अवगत करण्याच राहून गेलं असल तरी अगदी पांढऱ्या भुकटीनी नाही तरी अनोख्या, अद्वितीय जिद्दीनी मात्र ज्योतीताईंनी आयुष्याची रांगोळी फारच उत्तम रेखाटली आहे. राष्ट्रीय कला अकादमीचे कार्यकर्ते छान छान रांगोळ्या काढतात असं कौतुक करताना त्यांनी पायघडी अभियानात सहभागी झाल्याचे सांगितले. 
                 बहुश्रुत आणि स्वाभिमानी असल्यामुळे स्त्रियांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाबद्दल नाराजी व्यक्त करताना त्या म्हणाल्या स्त्रियांनी त्यांची मानसिकता बदलायला हवी, शिक्षण नोकरी आणि त्यात असणाऱ्या आरक्षणाच्या हमीमुळे त्यांच्यात येणाऱ्या अहंपणावर व अधुनिकतेकडे वाहवत जाण्यावर कुठेतरी आळा बसायला हवा असं परखड मत त्यांनी व्यक्त केल. स्त्रियांना आरक्षित ठेवलेली जागा जर पुरुषांना मिळाली तर त्यांची कुटुंबे चालू शकतील आणि पुरुषप्रधान समाजात घरातली बाई कमावती आणि पुरुष घरी बसलेला हे दृश्य दिसणार नाही त्यातून पर्यायाने निर्माण होणारे वितुष्ट, वादविवाद, घटस्फोट कमी होतील असही त्या म्हणाल्या. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आधी स्वतः पासून सुरवात करावी असा मोलाचा संदेश त्यानी दिला.
             आजचा आधुनिक समाज बघता स्त्रियांनी  स्वावलंबी व सुशिक्षित असण्याची गरज असून स्त्रियांवर होणारे अत्याचार, शारीरिक, मानसिक छळ रोखण्यासाठी स्त्रियांनीच संयमाने व खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केल. 
 
 
मुलाखत श्रीमती ज्योती मुंगसे 
मुलाखतकार तेजश्री पावसकर
रेवती ढमढेरे
शब्दांकन: तेजश्री पावसकर 
०७.११.२०११ 

Friday, October 28, 2011

दिपावली

                  दिपावली म्हणजे दिव्यांचा उस्तव... नात्यांचा सण ! दिवाळीच औचित्य साधून घरादारात, रस्त्यांवर, उद्यानात, पारंपारिक वास्तुत, सार्वजनिक स्थळांमध्ये हजारो दिवे लावून दिपोस्तव साजरा केला जातो. नात्यातला ओलावा टिकून राहण्यासाठी दिवाळी एक हक्काचा उत्सव. 
दिवाळी म्हणजे धमाल,
दिवाळी म्हणजे फराळ  
दिवाळी म्हणजे रोशनाई, 
दिवाळी म्हणजे आप्तेष्टांच्या भेटीगाठी
दिवाळी म्हणजे भेटवस्तू, मिठायांची देवाणघेवाण, 
दिवाळी म्हणजे शुभेच्छापत्र, रांगोळ्या अन अभ्यंगस्नान
दिवाळीचा महोत्सव खरच काही खास असतो, नेत्रदीपक चैतन्यदायी असे वातावरण असत,  ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान येणारा हा उस्तव सात दिवसांचा...पण त्यातले चार दिवस अधिक जल्लोषात साजरे केले जातात, हरेक दिवसाच आगळ वेगळ महत्व.
                 अश्विन कृ. एकादशी म्हणजेच रमा एकादशीला पहिला दिवा लावण्याची अगदी जुनी प्रथा,
दुसरा दिवस म्हणजे द्वादशीचा म्हणजेच वासुबारसेचा, ह्या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, सवाष्णी गोमातेला गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात, मग गोमातेला वंदन करून पुढील सुखकर आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले जातात. गोमातेमध्ये तेहतीस कोटी देव सामावले असल्याची श्रद्धा असल्याने गोमातेला केलेले वंदन थेट तेहतीस कोटी देवांपाशी पोहोचते असे मानतात.
त्या नंतर येते ती धनत्रयोदशी , ह्यादिवशी देवांचे वैद्य 'धन्वंतरी' ह्यांची पूजा होते. ह्यादिवाशीच यमदीपदान असते. यमासाठी कणकेचा दिवा लावला जातो. यमाची दिशा 'दक्षिण' म्हणून हा दिवा दक्षिणेला ज्योत येईल अश्या पद्धतीने ठेवला जातो.
                 दुसऱ्या दिवशी येते ती नरकचर्तुदशी, हीच दिवाळी पहाट! अशी दंत कथा आहे की ह्या दिवशी जो सूर्योदयानंतर उठेल किंवा स्नान करेल तो नरकात जाईल. वास्तविक स्वर्ग, नरक ह्या सर्व कल्पना माणसाच्याच पण काही का असेना दिवाळीच्या पहाटे पहाटे उठून आईकडून सुगंधित तेल, उटन लावून घ्यायच आणि मग कढत्या पाण्याने स्नान! वाह !!!! दिवालीका मजाही कुछ और है! दिवाळी पहाटे  नवीन नवीन कपडे घालून घर पणत्यांनी भरून टाकायचं.. त्यानंतरच  देवदर्शन, कुटुंबासमवेत यथेच्छ फराळ, गप्पा टप्पा जवाब नही!
              नंतरच्या दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन, लक्ष्मी घरी नांदावी म्हणून तिची पूजा केली जाते.
             त्यानंतरचा दिवस म्हणजे कार्तिक शु. प्रतिपदा, बलिप्रतिपदा किंवा  पाडवा नवीन जोडप्यातील नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी आणि जुन्यांमधला आहे तसाच टिकवण्यासाठीचा खास दिवस! ह्यादिवशी बायको नवऱ्याला ओवाळते. दुकानदारांसाठी हा वर्षाचा पहिला दिवस असतो. त्यांच्या जमाखर्चाच्या वहीची पूजा आदल्या दिवशी केली जाते. बळी राजा ह्याच दिवशी दैत्यांवर विजय मिळवून परतला होता त्यामुळे ह्या दिवशी बळी राजाचेही स्मरण केले जाते.
             त्या नंतर येते यमद्वितीया किंवा भाऊबीज , भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिच्या कडून ओवाळून घेतो, अस म्हणतात ह्या दिवशी यमही त्याच्या बहिणीकडे यमिकडे जाऊन ओवाळून घेतो.
ह्या चारही दिवसातले खरे सार, आणि आकर्षणाचा विषय म्हणजे दिवे... पणत्या, आकाशदिवे, इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा लावून जमीन, आकाश उजळवून टाकले जाते. दिवाळीची रोशनाई नेत्रदीपक असते, ह्या चार दिवसातलं आणखीन एक आकर्षण म्हणजे आतिषबाजी, आणि फटाके...तस असल तरी आजकाल मात्र सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनी फटाके फोडण्याचे टाळले जाते...

             नुकती थंडी सुरु झालेली असते आणि त्यात दिव्याची उब घरादारात रेंगाळते.... 

वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या निवडून निवडून आणायच्या आणि विविध रंगांनी घरी स्वतःच रंगवून आदल्या रविवारीच तयार ठेवण्याच काम अगदी आवडीच! अशी वेगवेगळी सजावट करून घरासमोर पणत्या ठेवून घरगुती दीपोत्सव दरवर्षीचाच....

सार्वजनिक ठिकाणी सुद्धा हजारो दिवे लावून दिवाळीचे जल्लोषात स्वागत होते.

                 पणत्यांबरोबरच आकाशदिवे लावून दिवाळीच स्वागत केल जात. बाजारात अनेक आकाराचे आकाशदिवे मिळत असले तरी घरी आकाशकंदील स्वतः करण्याची मजा काही वेगळीच.....शिवाय कल्पना शक्तीला आणि कलाकौशल्याला वाव...


ह्या वर्षी मी असा कमळाच्या आकाराचा आकाशदिवा बनवला होता.

दिवाळीच आणि रांगोळीच नात अगदी जुनंच बरका! दिवाळीच्या निम्मिताने घरासमोर, देवळात, आणि सार्वजनिक जागी लहान, मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेरची रांगोळी हे संस्काराच प्रतिक मानल जात, रांगोळीतले रंग घरातील सुख समृद्धीची जाणीव करून देतात.


मी ही पाच बोटांची रांगोळी गच्चीत दिवाळी पहाटे  काढली होती, प्रथमच अगदी आखणीपासून रंग भरून त्यावर रांगोळी काढण्याच काम एकटीने केल होत, खूप मजा आली...


मी रांगोळी काढताना ....


देवळासमोरची रांगोळी .....



पाच बोटांची रांगोळी कितीही आकर्षक असली तरी घरासामोरमात्र ठीपक्यांचीच रांगोळी...
ऐनवेळी सुचेल तशी रांगोळी काढत गेले...


आणखीन एक ठिपक्याची रांगोळी



पाच बोटांच्या रांगोळीच कौशल्य रांगोळीची रेघ न चुकवण्यात तर ठिपक्यांच्या रांगोळीच, रांगोळीची रेघ रंगानी न पुसून देण्यात, दोन्ही रांगोळ्यांच सौंदर्य रंगानी वाढत त्यामुळे रंगसंगती सर्वात महत्वाची, पाच बोटांच्या रांगोळीत आधी रंग भरून मग त्यावर रांगोळी रेखाटली जाते, ह्यात मुक्तहस्ते रांगोळी रेखाटली जाते, तर ठिपक्यांच्या रांगोळीत आधी बाह्यरेषा निश्चित केल्या जातात आणि मग त्यात रंग भरले जातात. पाच बोटांची रांगोळी आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेऊनही मुक्तपणे जगायला शिकवते तर ठिपक्यांची रांगोळी मर्यादेत राहूनही सुंदर जगायला शिकवते.  
बाजारात कितीही छान छान भेटकार्ड मिळत असली तरी आप्तेष्ट, नातलगां देण्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेल्या अश्या शुभेच्छा पत्रकात काही वेगळच प्रेम असत,


पेपर क्विलिंग पासून बनवलेलं भेटकार्ड

चार दिवस दिवाळीचे कसे गेले कळालच नाही पण यंदाची दिवाळी आठवणीत मात्र कायमच जागी राहील....

तेजश्री
२९.१०.२०११


Sunday, August 7, 2011

समुद्र किनारा


एका मोठ्याश्या दगडावर मी बसले होते, डोळ्यासमोर थेट क्षितिजापर्यंत समुद्राच्या लाटा उसळत होत्या, एक लाट विरते तोस्तवर दुसरी तयार झालेलीलाटांच नीळशार पाणी त्या निळ्या रंगात सहजतेने आपला रंग विरघळवणार आकाश, आकाशात एक तळपता लालबुंद गोल, आता काही क्षणातच हा गोल इतका तळपेल इतका तळपेल की त्याला शांत व्हायला जलसमाधी घ्यावी लागेल, त्या लाल गोलाच अस्तित्व त्याच्या पुरत मर्यादित नाही तर ते अवताली भवताली पसरलेल, लाल केशरी पिवळा, निळा, जांभळा अश्या रंगांच्या असंख्य छटा, अगदी ज्या रंगपेटीतही नसतील अश्या, अतिषय मोहक, सुंदर... ब्रशने उभे, आडवे तिरपे कसेही जरी फटकारे एखाद्या थोर चित्रकाराने मारले तरी त्यातून जस उत्कृष्ठ चित्र बनत अगदी तसच ह्या छटा बघून मला वाटल...काय थोर असेल तो कलाकार!! समुद्राच्या पल्याड तो भेटला आकाशाला आणि अल्याड भेटला किनार्याला. किनाऱ्यावरची मऊ मऊ वाळू सोनेरी चकाकणारी सूर्यकिरणे थेट परावर्तीत करत होती. किनार्यावरल्या रेतीत खेकडे पाय खुपसून चालत होते आणि त्यांच्या नांगीने रेखीव नागमोडी रेषा तयार झाल्या होत्या. अनेक रंगीबेरंगी शंख शिंपले विखुरले होते. त्या वाळूत कैक तासान तास लहानगी मुल खेळत होती. अगदी क्षणिक आनंदासाठी सुद्धा त्यानी तो वाळूचा किल्ला हौसेने बांधला होता, त्या किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी खंदक खोदले होते, त्या खंदकात ओंझळी ओंझळीतून  पाणी आणून भरतानाचा निरागस आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. किनार्याच्या बाजूला जणू रक्षणासाठी उभी केल्यासारखी नारळाची पोफळीची झाडं दूर पर्यंत पसरलेली होती, झाडांच्या आडून हळूच डोकावणारी लाल उतरत्या टोपीची कौलारू घर फारच मोहक दिसत होती,  पुन्हा नजर फिरून समुद्राकडे गेली आणि पाण्यात पांगलेली  शिडाची जहाज दृष्टीस पडली, वार्याचा दिशादर्षकाप्रमाणे वापर करत त्या जहाजांनी अगदी अचूक दिशा पकडली होती, कुठे न भरकटता त्यांची मार्गक्रमणा चालू होती, कुठे मधूनच  समुद्रावरून उडणारे सीगल पक्षी दिसत होतेकुठे दूरवर डॉल्फिन पाण्याबाहेर येऊन उड्या मारण्याची प्रात्यक्षिक करत होते. कुठे मधेच एखादा पक्षी झपकन झेप घालून एखादा मासा पकडून आपल्या पिल्लांसाठी नेत होता, एव्हाना लाटांचा जोर बऱ्यापैकी वाढला होता मगाशी फक्त पदस्पर्शणारी लाट आता कमरेपर्यंत वर आली होती, खाऱ्या पाण्याचा वास  अवतीभवती दरवळत होता. आकाशातल लाल सफरचंद एव्हाना समुद्राने खाऊन टाकल होत.  एक मंद मंद संधिप्रकाश पसरला होता. कितीदा समुद्र बघितला असेल त्यात खेळले असेन, दरवेळेस नव्याने मोहात पडणारा समुद्र किनारा मात्र हा किनारा काही वेगळाच होता, मनाच्या कोपर्यात दडलेला दडून सुद्धा स्वच्छ छबी असलेला!!!!

तेजश्री 
०७.०८.२०११  

Sunday, June 12, 2011

नवा दृष्टीकोन


आज सकाळी सकाळी घराच्या गच्चीवर मी गेले, नित्य सवईने झाडांना पाणी घालून झाल, फुल काढून झाली, पाणी घालताना त्यांच्याशी गप्पा मारून झाल्या, घराच्या समोरच्या ढोलीतील पोपट बघून झाले, कावळ्यांना उचकवून झालं, कबुतरांच निरीक्षण करून झालं, मांजरीला वेडावून झालं, बुलबुल, मैना, घारी, चिमणी, रॉबिन, सनबर्ड  साऱ्या साऱ्यांची हजेरी घेऊन झाली आणि आता मी खाली निघणार एवढ्यात वरच्या एका तारेवर बसलेला पक्षी मला खुणावू लागला. चकाकणारा निळा रंग जाड लांब अशी चोच आणि पांढरी छाती खुप मजा वाटली. अरे हा तर खंड्या! उदगार आपसूक बाहेर पडले. पाणवठ्याजवळ आढळणारा हा पक्षी आज इथली वाट कशी चुकला हे बघून आश्चर्य वाटल पण त्याच बरोबर आपण तयार केलेल्या छोटूशा कुटुंबात सर्वप्रथम आल्याबद्दल खुप कौतुकही केल. तो बिच्रारा काहीही न बोलता  गप गुमान बसला होता, वाट चुकला होता की काय माहित नाही पण तो आज इथे आला हेच खुप भारी वाटल. जरास गावाच्या बाहेर गेलं की हमखास सापडणारा हा खंड्या लांब लांब उडत इकडे कुठे बर आला असेल असा विचार करत मी खाली आले. 
दिवसभरात कामामध्ये गढून गेल्यावर मी हे साफ विसरूनच गेले, मात्र आत्ता हे सगळ झरझर डोळ्यासमोर आल आणि वेगळ्याच गोष्टीची जाणीव झाली. वास्तविक मी लहान असताना घरच्या देवाला फुल मिळावीत ह्या स्वार्थी हेतून झाडं लावली, एक एक करत ती वाढवली,  फुलवली, जपली. हा हा म्हणता गच्ची पन्नास एक झाडांनी भरून गेली.  हळू हळू वेगवेगळे पक्षी, फुलपाखर येऊ लागली बागेत मनसोक्त खेळू लागली आणि जीव आपोआपच रमत गेला. चिमणिनी आणलेल्या काड्या किवा बुलबुलाने कुंडीतल्या इवल्याश्या कढीलिंबाच्या झाडावर घेतलेले झोके सनबर्डनी अखंड केलेला फडफडाट मन भारावून टाकत राहिला. निसर्ग, पक्षी, फुलपाखर आजपर्यंत खुप लांब दूरवर गावाच्या बाहेर बघितली होती, ती आता माझ्या घराचा, कुटुंबाचा भाग होत आहेत हे बघून खुप समाधान वाटल. अस वाटल अरे हेच, हेच तर हव होत आपल्याला, सगळा निसर्ग आपल्या जवळ असावा, सगळ्यांनी आपल्याशी बोलाव, सगळ्यांना हे आपलच घर वाटावं, मनसोक्त खेळावं. एक पराकोटीच समाधान मिळाल. धन्य वाटल. 

तेजश्री 
(२०.०१.११ )