Sunday, November 13, 2011

मुलाखत श्रीमती ज्योती मुंगसे


                'हृदयज्योत' संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा श्रीमती ज्योती मुंगसे ह्यांना सुद्धा जन्मजात हृदयदोष आहे. हृदयदोष असणाऱ्या  मुलांना व पालकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा स्वानुभव आल्यामुळे ह्या संस्थेची स्थापना ३ जून २००४ मध्ये करण्यात आली. मुख्यतः हृदयदोष असणाऱ्या मुलांच्या पालकांना समुपदेशनामार्फत मानसिक आधार दिला जातो तसेच हृदय शस्त्रक्रियेसाठीच्या निधी संकलनाबाबत आवश्यक ती माहिती पुरवली जाते व शस्त्रक्रिया होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन दिले जाते.  ज्योती ताईंशी बोलताना हळूहळू उलगडा झाला की निसर्गाने विविध  हृदयदोष, फुफुसदोष एकाच वेळी देऊन ताईंची जणू सत्वपरीक्षाच घेतली त्यातून त्यांनी जिद्दीने दिलेला जीवनलढा खूपच स्फूर्तीदायी आहे. 
              'हृदयज्योत' संस्थेची स्थापना करण्यामागची कारणं सांगताना ज्योतीताई म्हणाल्या, मैत्रिणीच्या साधर्म्य असणाऱ्या अशाच हृदयदोषात जीव तोडून केलेले प्रयत्न शेवटी अपुरे पडले आणि शस्त्रक्रीयेआधीच ती दगावली तो सर्वात पहिला घाव होता, त्यातून एक अपराधीपणाची भावना आली. पुढे स्वतःच्या आयुष्यातही जगण्यासाठी बराच झगडा करावा लागत होता. जीवनातील मजा अनुभवताना त्रासही तितकाच होत होता, थोडीदेखील दगदग सहन व्हायची नाही, कॉलेजमध्ये असताना दोन तास दांडीया खेळल्याच मोल त्यांना सहा महिने पलंगावर काढून मोजाव लागल शिवाय कॉलेज सुटल ते निराळच.  त्यानंतर पार्लर, पाळणाघर चालवणे ह्या सारखे बारीक सारीक उद्योगही ताईंनी केले. मनातली जिद्द कायम होती त्यामुळे त्यांनी अर्धवट राहिलेलं 'बीए'चं शिक्षण पूर्ण केल पुढे एमएला देखील प्रवेश घेतला मात्र तेव्हा शरीरानी म्हणावी तितकी साथ दिली नाही शिक्षण पुन्हा सुटल अडीच वर्ष पलंगावर काढावी लागली, सवंगडी आपापल्या व्यापात, अश्या आजारात कुणी जवाबदारी घेणंही अवघडच, कुठे जाण येण नाही, दिवसरात्र पलंगावरच काढायची, असं झगडत आयुष्य काढावं लागतंय ह्यामागच देवाचं प्रयोजनही समजत नव्हत. पण ह्या काळात एक विरंगुळा होता तो पुस्तकांचा! वाचनाची आवड असल्याने ज्योती ताई ह्या काळात खुप वाचत राहायच्या, ह्याच दरम्यान वाचनात आलेल 'चाकाची खुर्ची' हे नसीमा तस्लीम हुरजूक ह्यांच पुस्तक खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान बनल आणि आपल्यासारख्याच हृदयदोष असणाऱ्या मुलांसाठी आपण काहीतरी कराव ही कल्पना प्रबळ होत गेली. स्वतः पलंगावर असताना हे कस काय करणार ह्या विचारात सुरवात म्हणून  स्वतःवर एक लेख त्यानी 'सकाळ' साठी लिहिला त्यात अश्या रुग्णांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्त्यातून असंख्य फोन, पत्र आली. सुरवातीला लोकांनी त्यांच्यासमोर सांसारिक प्रश्नांपासून अगदी कर्करोग, एडस सारख्या समस्या मांडल्या पण मग पुढे त्यातून हृदयदोष ह्यावरच लक्ष नियंत्रित करून ताईंनी 'हृदयज्योत' नावाची संस्था स्थापन केली. 
                'हृदयज्योत' संस्थेच काम थोडक्यात सांगताना त्यांनी नमूद केल, सुरवातीला हृदयदोषाच्या रुग्णांना मानसिक आधार देतात व त्यांचे समुपदेशन करतात.  त्याबरोबर कोणत्या संस्था ह्या रोग्यांसाठी मदत करतात त्यांच्या कडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा ह्याच मार्गदर्शन करतात. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सोई लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि एकंदरच ह्या व्याधीविषयी जनजागृती करण्यासाठी खेडोपाडी जाऊन ताईंनी व्याख्याने दिली, व तीन वर्ष समुपदेशन केंद्र चालवले 
                हृदयदोष असणाऱ्या चिमुरड्यांच्या पालकांना त्यांनी योग्य वयात निदान झाल्यावर औषधोपचार, गरज भासल्यास शस्त्रक्रिया, अविलंब करण्याचा संदेश दिला. 
                हृदयदोषावर जनजागृतीकरणारा 'हृदयाची गोष्ट' नावाचा माहितीपट नुकताच सप्टेम्बर ०११ मध्ये त्यांनी प्रदर्शित केला असून आगामी दिवसात हा माहितीपट राष्ट्रीयपुरस्कारासाठी पाठवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 'हृदयज्योत' नावाची ह्या हृदयदोषावरील पुस्तिका त्यांनी २००८ मध्ये प्रकाशित केली आहे. हृदयदोषावरील सविस्तर माहिती, निदानपद्धती, उपचारपद्धती, सरकारी मदतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहितीही ह्यात पुरवली आहे. 
              सरकारने जरी हृदय शस्त्रक्रियेसाठी  विवीध योजना राबवल्या असल्या तरी सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रीयेनंतर लागणाऱ्या उपकरणांची सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेक दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना खाजगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे पर्यायाने सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीचा फायदा त्यांना होतच नाही ह्या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली 
                शारीरिक अडचणीमुळे गाणं, नाच किंवा रांगोळीची कला अवगत करण्याच राहून गेलं असल तरी अगदी पांढऱ्या भुकटीनी नाही तरी अनोख्या, अद्वितीय जिद्दीनी मात्र ज्योतीताईंनी आयुष्याची रांगोळी फारच उत्तम रेखाटली आहे. राष्ट्रीय कला अकादमीचे कार्यकर्ते छान छान रांगोळ्या काढतात असं कौतुक करताना त्यांनी पायघडी अभियानात सहभागी झाल्याचे सांगितले. 
                 बहुश्रुत आणि स्वाभिमानी असल्यामुळे स्त्रियांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाबद्दल नाराजी व्यक्त करताना त्या म्हणाल्या स्त्रियांनी त्यांची मानसिकता बदलायला हवी, शिक्षण नोकरी आणि त्यात असणाऱ्या आरक्षणाच्या हमीमुळे त्यांच्यात येणाऱ्या अहंपणावर व अधुनिकतेकडे वाहवत जाण्यावर कुठेतरी आळा बसायला हवा असं परखड मत त्यांनी व्यक्त केल. स्त्रियांना आरक्षित ठेवलेली जागा जर पुरुषांना मिळाली तर त्यांची कुटुंबे चालू शकतील आणि पुरुषप्रधान समाजात घरातली बाई कमावती आणि पुरुष घरी बसलेला हे दृश्य दिसणार नाही त्यातून पर्यायाने निर्माण होणारे वितुष्ट, वादविवाद, घटस्फोट कमी होतील असही त्या म्हणाल्या. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आधी स्वतः पासून सुरवात करावी असा मोलाचा संदेश त्यानी दिला.
             आजचा आधुनिक समाज बघता स्त्रियांनी  स्वावलंबी व सुशिक्षित असण्याची गरज असून स्त्रियांवर होणारे अत्याचार, शारीरिक, मानसिक छळ रोखण्यासाठी स्त्रियांनीच संयमाने व खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केल. 
 
 
मुलाखत श्रीमती ज्योती मुंगसे 
मुलाखतकार तेजश्री पावसकर
रेवती ढमढेरे
शब्दांकन: तेजश्री पावसकर 
०७.११.२०११ 

Friday, October 28, 2011

दिपावली

                  दिपावली म्हणजे दिव्यांचा उस्तव... नात्यांचा सण ! दिवाळीच औचित्य साधून घरादारात, रस्त्यांवर, उद्यानात, पारंपारिक वास्तुत, सार्वजनिक स्थळांमध्ये हजारो दिवे लावून दिपोस्तव साजरा केला जातो. नात्यातला ओलावा टिकून राहण्यासाठी दिवाळी एक हक्काचा उत्सव. 
दिवाळी म्हणजे धमाल,
दिवाळी म्हणजे फराळ  
दिवाळी म्हणजे रोशनाई, 
दिवाळी म्हणजे आप्तेष्टांच्या भेटीगाठी
दिवाळी म्हणजे भेटवस्तू, मिठायांची देवाणघेवाण, 
दिवाळी म्हणजे शुभेच्छापत्र, रांगोळ्या अन अभ्यंगस्नान
दिवाळीचा महोत्सव खरच काही खास असतो, नेत्रदीपक चैतन्यदायी असे वातावरण असत,  ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान येणारा हा उस्तव सात दिवसांचा...पण त्यातले चार दिवस अधिक जल्लोषात साजरे केले जातात, हरेक दिवसाच आगळ वेगळ महत्व.
                 अश्विन कृ. एकादशी म्हणजेच रमा एकादशीला पहिला दिवा लावण्याची अगदी जुनी प्रथा,
दुसरा दिवस म्हणजे द्वादशीचा म्हणजेच वासुबारसेचा, ह्या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, सवाष्णी गोमातेला गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात, मग गोमातेला वंदन करून पुढील सुखकर आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले जातात. गोमातेमध्ये तेहतीस कोटी देव सामावले असल्याची श्रद्धा असल्याने गोमातेला केलेले वंदन थेट तेहतीस कोटी देवांपाशी पोहोचते असे मानतात.
त्या नंतर येते ती धनत्रयोदशी , ह्यादिवशी देवांचे वैद्य 'धन्वंतरी' ह्यांची पूजा होते. ह्यादिवाशीच यमदीपदान असते. यमासाठी कणकेचा दिवा लावला जातो. यमाची दिशा 'दक्षिण' म्हणून हा दिवा दक्षिणेला ज्योत येईल अश्या पद्धतीने ठेवला जातो.
                 दुसऱ्या दिवशी येते ती नरकचर्तुदशी, हीच दिवाळी पहाट! अशी दंत कथा आहे की ह्या दिवशी जो सूर्योदयानंतर उठेल किंवा स्नान करेल तो नरकात जाईल. वास्तविक स्वर्ग, नरक ह्या सर्व कल्पना माणसाच्याच पण काही का असेना दिवाळीच्या पहाटे पहाटे उठून आईकडून सुगंधित तेल, उटन लावून घ्यायच आणि मग कढत्या पाण्याने स्नान! वाह !!!! दिवालीका मजाही कुछ और है! दिवाळी पहाटे  नवीन नवीन कपडे घालून घर पणत्यांनी भरून टाकायचं.. त्यानंतरच  देवदर्शन, कुटुंबासमवेत यथेच्छ फराळ, गप्पा टप्पा जवाब नही!
              नंतरच्या दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन, लक्ष्मी घरी नांदावी म्हणून तिची पूजा केली जाते.
             त्यानंतरचा दिवस म्हणजे कार्तिक शु. प्रतिपदा, बलिप्रतिपदा किंवा  पाडवा नवीन जोडप्यातील नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी आणि जुन्यांमधला आहे तसाच टिकवण्यासाठीचा खास दिवस! ह्यादिवशी बायको नवऱ्याला ओवाळते. दुकानदारांसाठी हा वर्षाचा पहिला दिवस असतो. त्यांच्या जमाखर्चाच्या वहीची पूजा आदल्या दिवशी केली जाते. बळी राजा ह्याच दिवशी दैत्यांवर विजय मिळवून परतला होता त्यामुळे ह्या दिवशी बळी राजाचेही स्मरण केले जाते.
             त्या नंतर येते यमद्वितीया किंवा भाऊबीज , भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिच्या कडून ओवाळून घेतो, अस म्हणतात ह्या दिवशी यमही त्याच्या बहिणीकडे यमिकडे जाऊन ओवाळून घेतो.
ह्या चारही दिवसातले खरे सार, आणि आकर्षणाचा विषय म्हणजे दिवे... पणत्या, आकाशदिवे, इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा लावून जमीन, आकाश उजळवून टाकले जाते. दिवाळीची रोशनाई नेत्रदीपक असते, ह्या चार दिवसातलं आणखीन एक आकर्षण म्हणजे आतिषबाजी, आणि फटाके...तस असल तरी आजकाल मात्र सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनी फटाके फोडण्याचे टाळले जाते...

             नुकती थंडी सुरु झालेली असते आणि त्यात दिव्याची उब घरादारात रेंगाळते.... 

वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या निवडून निवडून आणायच्या आणि विविध रंगांनी घरी स्वतःच रंगवून आदल्या रविवारीच तयार ठेवण्याच काम अगदी आवडीच! अशी वेगवेगळी सजावट करून घरासमोर पणत्या ठेवून घरगुती दीपोत्सव दरवर्षीचाच....

सार्वजनिक ठिकाणी सुद्धा हजारो दिवे लावून दिवाळीचे जल्लोषात स्वागत होते.

                 पणत्यांबरोबरच आकाशदिवे लावून दिवाळीच स्वागत केल जात. बाजारात अनेक आकाराचे आकाशदिवे मिळत असले तरी घरी आकाशकंदील स्वतः करण्याची मजा काही वेगळीच.....शिवाय कल्पना शक्तीला आणि कलाकौशल्याला वाव...


ह्या वर्षी मी असा कमळाच्या आकाराचा आकाशदिवा बनवला होता.

दिवाळीच आणि रांगोळीच नात अगदी जुनंच बरका! दिवाळीच्या निम्मिताने घरासमोर, देवळात, आणि सार्वजनिक जागी लहान, मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेरची रांगोळी हे संस्काराच प्रतिक मानल जात, रांगोळीतले रंग घरातील सुख समृद्धीची जाणीव करून देतात.


मी ही पाच बोटांची रांगोळी गच्चीत दिवाळी पहाटे  काढली होती, प्रथमच अगदी आखणीपासून रंग भरून त्यावर रांगोळी काढण्याच काम एकटीने केल होत, खूप मजा आली...


मी रांगोळी काढताना ....


देवळासमोरची रांगोळी .....



पाच बोटांची रांगोळी कितीही आकर्षक असली तरी घरासामोरमात्र ठीपक्यांचीच रांगोळी...
ऐनवेळी सुचेल तशी रांगोळी काढत गेले...


आणखीन एक ठिपक्याची रांगोळी



पाच बोटांच्या रांगोळीच कौशल्य रांगोळीची रेघ न चुकवण्यात तर ठिपक्यांच्या रांगोळीच, रांगोळीची रेघ रंगानी न पुसून देण्यात, दोन्ही रांगोळ्यांच सौंदर्य रंगानी वाढत त्यामुळे रंगसंगती सर्वात महत्वाची, पाच बोटांच्या रांगोळीत आधी रंग भरून मग त्यावर रांगोळी रेखाटली जाते, ह्यात मुक्तहस्ते रांगोळी रेखाटली जाते, तर ठिपक्यांच्या रांगोळीत आधी बाह्यरेषा निश्चित केल्या जातात आणि मग त्यात रंग भरले जातात. पाच बोटांची रांगोळी आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेऊनही मुक्तपणे जगायला शिकवते तर ठिपक्यांची रांगोळी मर्यादेत राहूनही सुंदर जगायला शिकवते.  
बाजारात कितीही छान छान भेटकार्ड मिळत असली तरी आप्तेष्ट, नातलगां देण्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेल्या अश्या शुभेच्छा पत्रकात काही वेगळच प्रेम असत,


पेपर क्विलिंग पासून बनवलेलं भेटकार्ड

चार दिवस दिवाळीचे कसे गेले कळालच नाही पण यंदाची दिवाळी आठवणीत मात्र कायमच जागी राहील....

तेजश्री
२९.१०.२०११


Sunday, August 7, 2011

समुद्र किनारा


एका मोठ्याश्या दगडावर मी बसले होते, डोळ्यासमोर थेट क्षितिजापर्यंत समुद्राच्या लाटा उसळत होत्या, एक लाट विरते तोस्तवर दुसरी तयार झालेलीलाटांच नीळशार पाणी त्या निळ्या रंगात सहजतेने आपला रंग विरघळवणार आकाश, आकाशात एक तळपता लालबुंद गोल, आता काही क्षणातच हा गोल इतका तळपेल इतका तळपेल की त्याला शांत व्हायला जलसमाधी घ्यावी लागेल, त्या लाल गोलाच अस्तित्व त्याच्या पुरत मर्यादित नाही तर ते अवताली भवताली पसरलेल, लाल केशरी पिवळा, निळा, जांभळा अश्या रंगांच्या असंख्य छटा, अगदी ज्या रंगपेटीतही नसतील अश्या, अतिषय मोहक, सुंदर... ब्रशने उभे, आडवे तिरपे कसेही जरी फटकारे एखाद्या थोर चित्रकाराने मारले तरी त्यातून जस उत्कृष्ठ चित्र बनत अगदी तसच ह्या छटा बघून मला वाटल...काय थोर असेल तो कलाकार!! समुद्राच्या पल्याड तो भेटला आकाशाला आणि अल्याड भेटला किनार्याला. किनाऱ्यावरची मऊ मऊ वाळू सोनेरी चकाकणारी सूर्यकिरणे थेट परावर्तीत करत होती. किनार्यावरल्या रेतीत खेकडे पाय खुपसून चालत होते आणि त्यांच्या नांगीने रेखीव नागमोडी रेषा तयार झाल्या होत्या. अनेक रंगीबेरंगी शंख शिंपले विखुरले होते. त्या वाळूत कैक तासान तास लहानगी मुल खेळत होती. अगदी क्षणिक आनंदासाठी सुद्धा त्यानी तो वाळूचा किल्ला हौसेने बांधला होता, त्या किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी खंदक खोदले होते, त्या खंदकात ओंझळी ओंझळीतून  पाणी आणून भरतानाचा निरागस आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. किनार्याच्या बाजूला जणू रक्षणासाठी उभी केल्यासारखी नारळाची पोफळीची झाडं दूर पर्यंत पसरलेली होती, झाडांच्या आडून हळूच डोकावणारी लाल उतरत्या टोपीची कौलारू घर फारच मोहक दिसत होती,  पुन्हा नजर फिरून समुद्राकडे गेली आणि पाण्यात पांगलेली  शिडाची जहाज दृष्टीस पडली, वार्याचा दिशादर्षकाप्रमाणे वापर करत त्या जहाजांनी अगदी अचूक दिशा पकडली होती, कुठे न भरकटता त्यांची मार्गक्रमणा चालू होती, कुठे मधूनच  समुद्रावरून उडणारे सीगल पक्षी दिसत होतेकुठे दूरवर डॉल्फिन पाण्याबाहेर येऊन उड्या मारण्याची प्रात्यक्षिक करत होते. कुठे मधेच एखादा पक्षी झपकन झेप घालून एखादा मासा पकडून आपल्या पिल्लांसाठी नेत होता, एव्हाना लाटांचा जोर बऱ्यापैकी वाढला होता मगाशी फक्त पदस्पर्शणारी लाट आता कमरेपर्यंत वर आली होती, खाऱ्या पाण्याचा वास  अवतीभवती दरवळत होता. आकाशातल लाल सफरचंद एव्हाना समुद्राने खाऊन टाकल होत.  एक मंद मंद संधिप्रकाश पसरला होता. कितीदा समुद्र बघितला असेल त्यात खेळले असेन, दरवेळेस नव्याने मोहात पडणारा समुद्र किनारा मात्र हा किनारा काही वेगळाच होता, मनाच्या कोपर्यात दडलेला दडून सुद्धा स्वच्छ छबी असलेला!!!!

तेजश्री 
०७.०८.२०११  

Sunday, June 12, 2011

नवा दृष्टीकोन


आज सकाळी सकाळी घराच्या गच्चीवर मी गेले, नित्य सवईने झाडांना पाणी घालून झाल, फुल काढून झाली, पाणी घालताना त्यांच्याशी गप्पा मारून झाल्या, घराच्या समोरच्या ढोलीतील पोपट बघून झाले, कावळ्यांना उचकवून झालं, कबुतरांच निरीक्षण करून झालं, मांजरीला वेडावून झालं, बुलबुल, मैना, घारी, चिमणी, रॉबिन, सनबर्ड  साऱ्या साऱ्यांची हजेरी घेऊन झाली आणि आता मी खाली निघणार एवढ्यात वरच्या एका तारेवर बसलेला पक्षी मला खुणावू लागला. चकाकणारा निळा रंग जाड लांब अशी चोच आणि पांढरी छाती खुप मजा वाटली. अरे हा तर खंड्या! उदगार आपसूक बाहेर पडले. पाणवठ्याजवळ आढळणारा हा पक्षी आज इथली वाट कशी चुकला हे बघून आश्चर्य वाटल पण त्याच बरोबर आपण तयार केलेल्या छोटूशा कुटुंबात सर्वप्रथम आल्याबद्दल खुप कौतुकही केल. तो बिच्रारा काहीही न बोलता  गप गुमान बसला होता, वाट चुकला होता की काय माहित नाही पण तो आज इथे आला हेच खुप भारी वाटल. जरास गावाच्या बाहेर गेलं की हमखास सापडणारा हा खंड्या लांब लांब उडत इकडे कुठे बर आला असेल असा विचार करत मी खाली आले. 
दिवसभरात कामामध्ये गढून गेल्यावर मी हे साफ विसरूनच गेले, मात्र आत्ता हे सगळ झरझर डोळ्यासमोर आल आणि वेगळ्याच गोष्टीची जाणीव झाली. वास्तविक मी लहान असताना घरच्या देवाला फुल मिळावीत ह्या स्वार्थी हेतून झाडं लावली, एक एक करत ती वाढवली,  फुलवली, जपली. हा हा म्हणता गच्ची पन्नास एक झाडांनी भरून गेली.  हळू हळू वेगवेगळे पक्षी, फुलपाखर येऊ लागली बागेत मनसोक्त खेळू लागली आणि जीव आपोआपच रमत गेला. चिमणिनी आणलेल्या काड्या किवा बुलबुलाने कुंडीतल्या इवल्याश्या कढीलिंबाच्या झाडावर घेतलेले झोके सनबर्डनी अखंड केलेला फडफडाट मन भारावून टाकत राहिला. निसर्ग, पक्षी, फुलपाखर आजपर्यंत खुप लांब दूरवर गावाच्या बाहेर बघितली होती, ती आता माझ्या घराचा, कुटुंबाचा भाग होत आहेत हे बघून खुप समाधान वाटल. अस वाटल अरे हेच, हेच तर हव होत आपल्याला, सगळा निसर्ग आपल्या जवळ असावा, सगळ्यांनी आपल्याशी बोलाव, सगळ्यांना हे आपलच घर वाटावं, मनसोक्त खेळावं. एक पराकोटीच समाधान मिळाल. धन्य वाटल. 

तेजश्री 
(२०.०१.११ )

एक दिवस जंगलातला


निळ तळ दूरवर पसरल होत, मंद वाऱ्याच्या झुळकीबरोबर नुकतीच नाहून निघालेली हिरवी गार पान पक्ष्यांच्या सुरेल गाण्याला सुरेख साद करत होती, मधेच एखाद पिकल पान वारयावर स्वार होत आरामात खाली उतरत होत, तळ्यात उतरलेल्या गुलमोहोराच्या पाकळ्या इवलुश्या नावेप्रमाणे पाण्यात आपल रूप न्याहाळत पांगल्या होत्या. नीळ आभाळ आपल प्रतिबिंब बघण्यासाठी हिरव्या कमलदलांशी  स्पर्धा करत होत, गुलाबी, पिवळी, निळी कमळे आपल्या तळ्यातल्या वास्तव्याची आठवण करून देत होती. हिरवेगार मखमली गालिचे तळ्याच्या दोहोबाजुनी फोफावावले होते, अधून मधून पिवळ्या, तांबड्या तृणफुलांचे ताटवे वर डोके काढून सूर्य किरणांना धिटाईने सामोरे जात होते. फुलांवर भिरभिरणार्या पिवळ्या, लाल, निळ्या फुलपाखरांना क्षणभरही थांबण्याची उसंत नव्ह्ती. एकमेकात गुंफलेल्या फांद्यांच्या औदुंबराखाली मी पोहोचले, तळ्याकाठच्या परिसरात थोडावेळ घालवल्यावर मी पलीकडच्या जंगलात जाण्यासाठी तळ्याच्या डाव्याबाजूच्या अरुंद पुलाजवळ आले. पुलावरून कसरत करत मी पलीकडे पोहोचले, गवत दोहोबाजुनी कंबरेच्या वरपर्यंत वाढल होत, हातातल्या वाळक्या काठीने ते बाजूला करत मी जंगलाची वाट धरली, समोरच्या वडाने आपले जवळजवळ शे दोनशे हात पाय जमिनीत घट्ट रोवले होते, अर्थात एवढ्या महाकाय वृक्षात अनेक जीव सामावले होते, असंख्य और्कीडस आपल्या हक्काच्या घरासारखी पाय पसरून बसली होती. एवढ्यात पाण्यातून सळसळत एक पाणसाप तळ्याच्या काठावर आला, सकाळच कोवळ उन्ह खायला आला असावा बहुतेक कारण त्या नंतर तो तिथेच ठिय्या मांडून बसला, पायापाशी झालेल्या हालचालीने माझ लक्ष बुटाकडे गेलं तर एक बेडूक माझ्या बुडाच्या लेसशी खेळत होता. माझ लक्ष गेल्यावर मात्र साहेबांनी तळ्याच्या दिशेने धूम ठोकली. मी जंगलाकडे निघाले समोरच्या उंच झाडाच्या ढोलीत दोन पोपट बसलेले मला दिसले. पोपटिण बहुदा आज दूरवर फिरायला जाण्याचा हट्ट आपल्या जोडीदाराकडे करत असावी, तीच पोटावर वाकून त्याच्याकडे बघण, मन वळवून विशिष्ठ आवाज करण आणि म पोपट राजी झाल्यावर पंख फडफडवून व्यक्त केलेला आनंद पाठोपाठ त्या दोघांच दूरवर उडत जाण ह्यातून मला तरी असाच बोध झाला, माणसात असतात तेच भाव पक्षातही असतात असं जाणवलं आणि मजा वाटली. टौक टौक असा आवाज कानी पडू लागला, नजर तांबट पक्ष्याला शोधू लागली, आणि त्या आधी बुलबुलांची जोडी नजरेस पडली. एका बुलबुलाच्या चोचीत कसलं तरी फळ होत. ड्रोन्गोरावांनी आपली उलट्या व्ही ची शेपटी हलवत आपली उपस्थिती दिली. पलीकडच्या झाडावर फुलांभोवती फुलचुख्या एकसंध लयीत पण खुप वेगाने पंखांची फडफड करत होत्या, एवढ्याश्या जीवाला दमण्याची चिंता, कल्पनाच नव्हती. एवढ्यात निळ्या रंगाने माझ लक्ष वेधून घेतलं, तोंडात मासा धरून खान्डोपंत बसले होते, दोनदा मासा हवेत उडवून त्यांनी तो मासा गिळंकृत केला आणि पुढला मासा पकडण्यासाठी त्यांनी तळ्याच्या दिशेने रवानगी केली. पंखावरल्या  चमचमणाऱ्या निळ्या रंगाने डोळ्याच पारण फिटलं. काळ्या तोंडाच्या वानरांची टोळी नुकतीच तिथून गेली असावी, कारण अर्धवट खाल्लेल्या फळांचा सडाच मला दिसला, आणि त्यातलं एक अर्धवट वयातल एक पिल्लू मागेच राहील होत, माझी हालचाल होतच त्यानेही उड्या मारत पाच पन्नास झाडं मागे टाकली. थोड आणखीन आत गेल्यावर नाचऱ्या पक्षांचा सामुहिक नाच सुरु होता, आपली शेपटी पंख्यासारखी फुलवून त्यांचा नृत्याविष्कार बघताना मला आफ्रिकन झुंबा नृत्याची आठवण झाली, त्यात नृत्यप्रकारात सुद्धा असंच खाली बघून स्वतःभोवती गिरकी घेण्याच्या काही स्टेप्स असतात. त्याचं नृत्य बघण्यात मी रमलेली असतानाच कोकीळचा सुरेल आवाज कानी पडला. मी इकडून ओरडून कोकिळेला साद घातल्यावर तिकडून  तो आणखीन जोराने ओरडत असे अशी जुगलबंदी बराच वेळ चालली, शेजारच्या एका झाडावर वेड्या राघूंचा जोडा दिसला. आता जंगल थोड विरळ झालं होत, खडकांवरून वाहत वाहत एक खळखळता झरा दिसला, झऱ्याच पाणी पीऊन मी तिकडे थोडा वेळ काढला. ढगांकडे सताड डोळ्यांनी बघत खडकांवर निवांत पहुडण्याचा आनंद काही औरच, झरयाच्या वर एका झाडाची फांदी आली होती, फांदीवर दोन पाकोळ्या बसल्या होत्या, आपल्या तारेसारख्या शेपट्या हलवत त्यांचा शो चालू होता, मग एकदा पंख फडफडुन झाले, खाली वाकून झालं, एकदा पुढून एकदा मागून सगळी प्रदर्शन झाली, झऱ्यात पाणी प्यायला वेगवेगळे पक्षी आले, पोंड हेरॉन, कारमोरंन्ट आले होते, शेजारच्या झाडाच्या ढोलीतून मैना डोकावत होत्या, आपल्या इवल्या इवल्या पिल्लांना भरवतानाच समाधान शब्दांपलीकडच होत. बरच भटकून झालं  होत एव्हाना उन्ह डोक्यावर आल होत, अजून आत आत जाताना बाहेर येताना संध्याकाळ झाली असती त्यामुळे तशीच माघारी फिरले. थोड्याच वेळात एक झकास पावसाची सर आली आणि चिंब भिजवून गेली, उन्हानी झालेली चिकचिक कमी झाली, खाटिक, मुनिया, हळद्या प्रीनिया सारखे पक्षी जाता जाता दर्शन देऊन गेले,  तळ्यापाशी पोहचेपर्यंत सायंकाळ झाली होती सांजवेळच्या किरणांनी परीसासारखी जादू केली होती सकाळी नीळ असलेल तळ्याच पाणी सोनेरी झालं होत. कुट, कोर्मोरंन्ट, पोंड हेरॉन अजूनही डुबक्या मारत होते, सगळ्यांना मुश्कीलीनी अलविदा करून प्रसन्न अनुभवांनी मी परतले....     

तेजश्री 

Sunday, June 5, 2011

नाण्याच्या दोन बाजू

नाण्याला दोन बाजू असतात, एक छापा एक काटा. एखादी गोष्ट चूक की बरोबर हे ठरवण्यासाठी किंवा आपल मत मांडण्यासाठी आपण ह्या नाण्याच उदाहरण हमखास देतो. असा एक सर्वमान्य समज आहे की ह्यातली एक बाजू बरोबर किंवा योग्य असते आणि दुसरी चूक अथवा अयोग्य. पण गेल्या काही दिवसात वेगळ्या वेगळ्या गोष्टी अश्या स्वरुपात समोर आल्या की माझ एक मत तयार झालंय, ते असं की दरवेळेसच हा नियम लागू होत नाही. नाण्याच्या दोन बाजू तर असतात पण त्यातली एक योग्य असते आणि दुसरी पण योग्यच असते. कोण ठरवत त्याची योग्यता? तर ती आपण माणसच, सदसदविवेक बुद्धीनी आपण हा निर्णय घेऊ शकतो आणि त्यावरून निकषही लावू शकतो. हा असा विचार जेव्हापासून माझ्या मनात आला तेव्हा पासून एक बदल तर नक्की झाला अन अशी जाणीव झाली की आपल्याला अपेक्षित असलेल समोरची व्यक्ती वागत नसेल किंवा अपेक्षित प्रतिक्रिया देत नसेल तर होणारी चिडचिड थोडी कमी झाली आणि ती व्यक्ती तसं वागण्यामागे योग्य असं काहीतरी कारण तर नक्की असणार ह्याची खात्री वाटू लागली. असं ढोबळ बोलण्यापेक्षा काही अनुभवच सांगते,
 आज पर्यावरण दिन, पर्यावरण जागृकतेवरच्या एका चर्चेत मी एक श्रोता म्हणून सहभागी झाले होते, आणि माझ दोनही बाजू योग्य असं शकतात हे मत अधिकच प्रबळ झालं. आपण दरवेळेस हेच ऐकतो की झाडं लावा झाडं जगवा आणि झाडं तोडू नका आणि पर्यावरण रक्षक तर झाडं न तोडण्यासाठी जीवाचा इतका आटापिटा करत असतात, तर ह्या चर्चेत एकूण चार लोक सहभागी होते त्या पैकी तिघांचं बोलून झालं आणि त्यांच्या मते झाडं लावली पाहिजेत ती तोडता कामा नयेत आणि त्यांच्याच बरोबर जे चौथे गृहस्थ होते त्याचं मात्र जरा चमत्कारीकच मत होत. चमत्कारिक अश्यासाठी म्हणल कारण असा विचार मी तरी ह्या पूर्वी कधीही केला नव्हता आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा विचार वाटला. ते एक आर्कीटेक्चर होते आणि त्यांच्या मते घर बांधताना आपण लाकडाचा वापर अधिक करायला हवा.... आश्चर्य  वाटल ना... पण ह्या वर त्यानी जो खुलासा दिला  तेव्हा त्याचं म्हणण अंशतः का होईना पटल, नाहीतर इतर वेळेस असं बोलणाऱ्या माणसाला मी वेड्यात काढल असत आणि कदाचित पुढच काहीही ऐकून पण नसत घेतलं... पण त्या गृहस्थांच्या मते आपण सध्या घरबांधणी करताना स्टीलचा वापर करतो, स्टील साठी लागणार लोखंड आणि इतर गोष्टी आपण खाणीतून काढतो, बर ह्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा वापरत नाही, म्हणजे रिसायकल करत नाही, तेव्हा पुढे जाऊन खाणीतील खनिजे जेव्हा संपुष्टात येतील तेव्हा आपण काय करणार? त्यांची निर्मिती आपण माणस तर करूच शकत नाही, ह्या उलट लाकूड ही अशी गोष्ट आहे जी आपण प्रयत्नांनी निर्मित करू शकतो, ते म्हणजे झाडं लावून, तेव्हा स्टील किवा तत्सम खनिजांचा वापर टाळून आपण लाकडाच्या वापरावर अधिक भर द्यायला हवा, म्हटल तर ही बाजू अतिषय योग्य आहे, खरोखर प्रयत्न करून आपण झाडं लावून लाकुडनिर्मिती करून शकतो पण दुर्दैवानी आज झाडं तोडण्याची संख्या आणि लावण्याची संख्या आणि झाडं वाढून वृक्ष होऊन त्याची लाकड वापरात येऊ शकतील ह्याला लागणारा कालावधी ह्याचा ताळमेळ काही बसत नाही आणि ही गोष्ट अशक्यप्राय भासू लागते..... 
आणखीन एक उदाहरण म्हणजे एअर कन्डीशनरचा वाढता वापर, आता ह्याचा वापर करु नये कारण त्याने ग्लोबल वार्मिंग वगेरे होत हे तर आपल्याला माहीतच आहे त्यावर पुरेशी चर्चा आपल्या कानावर पडलेलीच असेल आपणही त्यावर पुरेसा चोथा होईपर्यत चर्चा केली असेल पण जर मी म्हणाले त्याचा वापर गरजेचा आहे तर.... आश्चर्य वाटेल कदाचित पण त्याला जोडून मी जर काही खुलासा केला तर कदाचित आपल्याला हे पटू शकेल... मी सध्या जिथे काम करते त्या प्रयोगशाळेत काही किमती अशी यंत्रे आहेत आणि ती सुरळीत चालवण्यासाठी तापमान हा एक प्रमुख घटक आहे आणि त्यासाठी  एअर कन्डीशनरचा वापर अत्यावश्यकच आहे, म्हणजे मी अत्यावश्यकच मध्ये च वर एवढा भर देते आहे त्यामागे असं कारण आहे, एकदा असच मी खुप थंडी वाजते म्हणून २६ अंश तापमान बदलून २७ केल आणि मग निश्चिंतपणे एक यंत्र वापरायला सुरवात केली. यंत्र सुरु केल्यावर त्याच कॅलीब्रेशन करण हा एक महत्वाचा भाग असतो आणि तेव्हा असं लक्षात आल ते तापमान १ अंशांनी वाढवल्यामुळे ते यंत्र कॅलीब्रेशन फेल्यूअर झाल्याच दाखवत होत. मला त्या खोलीच तापमान पुन्हा पूर्ववत होई पर्यंत थांबाव लागल... आणि एक वेगळा धडा मिळाला
काही दिवसांपूर्वी माझ्या भाचीला तेलमालिश करून अंघोळ घालायला एक मावशी येत असत, त्यांचा पहिलाच दिवस होता तेव्हा त्यानी तिला अंघोळ घालताना तिचे तोंड साफ केल नाही तर साहजिक त्यानंतर असा विषय झाला तेव्हा मी वहिनीला म्हटल की त्यांना सांगायला हव की तीच तोंड आतून साफ करत जा, आपल्याला हव तसं काम आपण करून घ्यावा लागत ... त्याचं त्याचं ते स्वतःच्या मनानी नाही करु शकत... वगेरे वगेरे आणि म थोडावेळ झाला, बाबा आले आणि त्यांना सहज मी हे सगळ सांगत होते की त्या मावशीनी तोंड नाही साफ केल पण बाकी व्यवस्थित घातली अंघोळ... त्यावर बाबा म्हणाले नाही केल तेच बर झालं... अरे? बरोबर माझ्या विरुद्ध मत? पण का? मी प्रश्न विचारायच्या आताच ते उतरले... कस आहे, त्या मावशी कुठून येतात आणि त्यांचे हात किती साफ असतात काय माहित... आपण हात धुवायला लावू सुद्धा एकवेळ पण   त्यांची नख?... त्यात अडकलेला मळ... त्यानी जर काही जखम झाली तर? त्यापेक्षा नकोच... खर तर होत त्याचं म्हणण
असच एकदा मी रस्त्याच्या कडेला एका ताईंबरोबर उभी होते एक दहा बारा वर्षाची मुलगी जवळ जवळ पळतच आली आणि आमच्यासमोरच्या रिक्षात शिरण्यासाठी तिच्या पाच सहा वर्षाच्या छोट्या बहिणीला गळ घालू लागली... पाठीमागून त्यांची आज्जी येत होती... छोटी बहिण आज्जी यायच्या आत आपण बसलो तर आज्जी मागेच राहील ह्या भावानेनी कावरी बावरी झाली होती तिला काय कराव काही सुचत नव्हत, एकदा पुढे तिच्या ताईकडे आणि एकदा मागे आज्जीकडे बघत ती रिक्षाजवळ आली ... अखेर ताईने खूपच गळ घातली किंवा जवळजवळ ताईगिरी केली म्हणून ती आत चढली... त्या मोठ्या ताईनी रिक्षावाल्यांना पत्ता सांगितला आणि एवढ्यात त्या दोन बालीकांची आज्जी तिथे आली आणि जोरात त्या दोघींना ओरडली.... तुम्हाला घाई करायला कोणी सांगितलेली मी येईपर्यंत सुद्धा तुम्हाला दम निघत नव्हता का? म्हटल तर अगदी बरोबर होत आज्जींच आजकाल कुणाची खात्री राहिली आहे? समजा त्या आज्जी यायच्या आधी रिक्षावाल्यांनी त्यांना नेल असत... तर? कदाचित हीच भीती त्या आज्जीना  वाटली असावी आणि त्याच काळजीपायी त्या तसं बोलून गेल्या... रिक्षा गेली आणि मग मला ताई म्हणाल्या किती चुकीच वागल्या ह्या आज्जी... त्या मुलीनी एवढी छान रिक्षा थांबवली आणि किती व्यवस्थित पत्ता सांगितला तिने  तेव्हा तीच कौतुक करायचं तर असं बोलून त्यांनी त्या मुलीचा आत्मविश्वास कमी केला ... मुलांच्या मानसिकतेवर ताईंचा अभ्यास होता त्यामुळे त्या अधिक खात्रीपूर्वक सांगत होत्या अश्या प्रसंगांमुळे निरागस बालमने दुखावतात आणि पुढच्यावेळेस आपण एखादी गोष्ट करू शकतो हा स्वतःवरचा विश्वासच ते विसरून जातात आणि जी खुप गंभीर बाब होऊ शकते...       
अशी एक ना अनेक उदाहरणे घडतात आणि नाण्याच्या दोन्ही बाजू योग्य भासतात....  

तेजश्री 
०५.०६.२०११ 

Sunday, May 22, 2011

शाळा


     आज खुप दिवसांनी शाळा बघितली आणि आपसूक शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या , शाळेतले ते दिवस खूपच छान होते. एक स्वतःच विश्व होत, कसला फारसा ताण नाही, फारस कसलं बंधन नाही... मुक्त दिवस होते... आणि म्हणूनच कदाचित ते मुक्त पाखरासारखे उडूनही गेले. 
     मी साधारण आठवीत असेन, शाळेकडून आंतरशालेय स्पर्धेत घोषपथकात माझी निवड झाली होती. साधारण आठ ड्रम, एक ढोल, दोन झांजा आणि सोळा बासरीवादक आणि अर्थात आमची म्होरकीण, स्टाफधारक असे आम्ही अठ्ठावीस जणी होतो.  मी बासरी वादकांपैकी एक होते. साधारण तीन एक महिन्यात आम्ही सर्वप्रथम सा रे ग म वाजवायला शिकलो आणि लागलीच वेगवेगळे  राग, गाण्यांचे अचूक सूर आम्ही बासरीतून काढू लागलो. बासरी वादनातल्या  खुबी सांगायला प्रशिक्षक होतेच. आम्ही स्पर्धेची तयारी चालू केली होती, स्पर्धेच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या नविन नविन रचना करून पाहत शेवटी आम्ही आठ रचना पक्क्या केल्या. 
     स्पर्धेचा दिवस उजाडला, सकाळी लवकरच आवरून शाळेत दाखल झालो, आम्हाला न्यायला एक टेम्पो आला होता, स्पर्धेच ठिकाण शाळेपासून बऱ्यापैकी दूर होत. शाळेनी दिलेला चहा नाश्ता घेतला आणि वाद्य टेम्पो टाकत एक एक करून आम्ही टेम्पोत घुसलो. गणपतीचे नाव घेऊन आम्ही निघालो. स्पर्धेच्या ठिकाणी आम्ही पोहचलो, वेगवेगळ्या शाळेच्या मुली आल्या होत्या. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी,  मैदान भरलं होत. नउच्या ठोक्याला स्पर्धा सुरु झाली, एक एक करून संघ येऊन आपलं   कौशल्य दाखवू लागले. शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आम्ही आखून दिलेल्या चौकोनात प्रवेश केला, स्पर्धेचे नियम पाळत आम्ही आमच कौशल्य दाखवायला सुरुवात केली. पहिल्या बारा मिनिटात सात रचना पूर्ण झाल्या, आमच्या प्रतिनिधीनी एकूण तीन वेळा स्टाफ हवेत उडवून झेलला होता,  स्टाफ जितके जास्त वेळा उडवला जाईल तितके आधी गुण खात्यावर जमा होतात, तसेच जर तो स्टाफ चुकून खाली पडला तर ती शाळा स्पर्धेतून तीन वर्षाकरता बाद होते. मनात उगाच धाकधूक होती, पण सगळ व्यवस्थित पार पडल, सातवी रचना बदलून आम्ही शेवटच्या रचनेत आलो, शेवटच गाण वाजवयला सुरवात केली, आणि बरोबर चौदाव्या मिनिटाला आम्ही आखून दिलेल्या चौकोनाबाहेर पडलो. स्पर्धा संपल्यावर बरोबर आलेल्या प्रशिक्षकांनी आम्हाला शाळेत जाण्याचा सल्ला दिला आणि आम्ही निकाल काय लागेल ह्याची उस्तुकता मनात ठेऊनच , शाळेत परतलो, साधारण आपल सादरीकरण कस झालंय ह्याची प्रत्येकालाच जाणीव होती त्यामुळे आपण नक्की जिंकूच अशी आम्हाला खात्री होती. असं म्हणतात ना You yourself are a good judge. आम्ही ठरवून टाकल होत आमचा विजय नक्की... आम्ही न राहवून येतानाच आरोळ्या द्यायला सुरवात केली ... शाळेच्या नावाची कीर्ती शहरभर पसरवायला आम्ही मागे पुढे बघितलाच नाही ... आम्ही शाळेत आलो आणि मुख्याध्यापिकांनी आम्हाला बोलावून घेतलं.. निकाल लागलेला नसताना तुम्ही कशासाठी आरोळ्या दिल्यात ह्या वरून आम्हाला खुप ओरडा बसला.. पुन्हा उगाच मनात शंकेची पाल चुकचुकली... आता जर आपण नाही जिंकलो तर? अजून ओरडा बसेल... आणि मोठा पोपट होईल तो तर वेगळाच... 
पुढचा अर्धातास आम्ही द्विधा मनस्थितीत आपण जिंकू की न जिंकू... निकालीची उस्तुकता शिगेला पोहचली होती. अर्ध्यातासानी प्रशिक्षक निकालाची बातमी घेऊन आले.. तृतीय क्रमांकांनी आम्ही जिंकलो होतो... आनंदाला सीमाच उरली नव्हती... प्रचंड जल्लोषात आम्ही शाळा दणाणून सोडली...घोष वादन करून आम्ही आमचं आनंद व्यक्त केला... शाळेच्या नावाच्या आरोळ्या जोरजोरात म्हणत आम्ही शाळा दणाणून सोडली... त्या आरोळ्या, ते शिक्षकांचे आणि शाळा मैत्रिणींचे कौतुकाचे चेहरे आजही लख्ख समोर आहेत...
        असे अनेक प्रसंग आठवतात... मी दहावीत असेन सहामाही परीक्षा झाली होती दिवाळी नंतर आम्ही शाळेत आलो... खुप बोर झालेले त्या दिवशी बाकावर शेजारी कोणीच नव्हत... गणिताचा तास चालू होता... आणि पानसे बाई खुप बोर काहीतरी सांगत होत्या मी खिडकीतून बाहेर  बघत होते ... बाईनी हे बरोबर हेरल... आणि मला उभ केल... काय चालू आहे तेजश्री? मी गप्प ... तोंडातून आवाजच फुटत नव्हता... थांब तुमच्या वर्गशिक्षिकेलाच सांगते..तापकीरच आहे ना वर्गशिक्षिका? .. नाहीतर आता तुमचे सहामाहीचे गुण कळल्यावरच बोलूयात आपण... असं म्हणत बाईनी पुढच शिकवायला सुरवात केली
          दुसर्यादिवशी पहिल्याच तासाला गुणपत्रिका मिळाल्या , गणित आणि शास्त्र विषयात सर्वाधिक गुण मलाच होते, गणित आणि शास्त्र दोन्ही विषय खुप लाडके असल्याने असे अव्वल गुण मिळण माझ्यासाठी नविन नव्हतच त्यामुळे मला काही आश्चर्य नव्हत वाटत पण अर्थात आनंद तर झालाच होता, तास संपला... दुसरा तास गणिताचाच होता, पानसे बाई आल्या, वर्गातली कुजबुज ऐकून आम्हाला त्यानी विचारलं काय मिळाल्या का गुणपत्रिका ? कुणाला सर्वाधिक गुण मिळाले ? माझ लक्षच नव्हत मी कसलतरी गणित सोडवत बसले होते... सगळ्यानी माझ नाव घेताच मी गडबडले बाई समोर उभी राहिले.. मला सर्वाधिक गुण मिळालेत बघून बाई अवाकच झाल्या होत्या त्यांच्या तोंडचे उद्गार अजून आठवतात... ' तेजश्री तुला सर्वाधिक गुण आहेत! ...आता तु बाहेर बघ, शिकवताना लक्ष दे किवा नको देऊ... मी काहीही बोलणार नाही तुला' ... आज ते वाक्य आठवलं की खुप हसू येत... 
         मी चौथीत असतानाची गोष्ट रांगोळीची स्पर्धा होती एक फुट बाय एक फुट अश्या चौकोनात रांगोळी काढायची होती... रांगोळी कधी हातात सुद्धा धरली नव्हती... माझ्या मैत्रिणीनी स्नेहलनी  माझं नाव देऊनही टाकल रांगोळीसाठी... आणि मी तुला शिकवीन रांगोळी कशी काढायची म्हणून अशी हमीही दिली .. मी निर्धास्त झाले... तिने शिकवलेल्या ७ ते ३ ठीपक्याच्या रांगोळीची मी खुप मनापासून तयारी केली, घरी येऊन बाबांच्या मदतीने कुठे कोणते रंग भरायचे ते ही ठरवलं... शनिवारी सकाळची शाळा झाल्यावर दुपारी स्पर्धा होती... सभागृहात खुप गर्दी होती सगळ्या मैत्रिणीच होत्या पण खुप छान छान रांगोळी काढणाऱ्या मला रांगोळी शिकवलेली स्नेहलही होती... सभागृहाच्या मध्यभागी एक मुलगी संस्कारभारतीची खुप मोठी रांगोळी काढत होती, वाटल अरे आपल्याला जो नियम सांगितलेला एक फुट बाय एक फुट त्याच काय झालं? मला उगाच न्युनगन्ड वाटू लागला  शेजारच्या एका मैत्रिणीला तिची आई रंग कसे भर ते सांगत होती...  वाटल अरे आपण पण आणायला हव होत का कुणाला... पण ही तर फसवणूक झाली... स्पर्धेत कशी काय मदत करतात पालक... मी दुर्लक्ष केल... आनंद मिळवण्यासाठी मी भाग घेतलेला जिंकन वगेरे फारच दुरची गोष्ट होती... बाहेर पाऊस पाडत होता माझा दादा घ्यायला आला ... मी कौतुकाने त्याला माझी रांगोळी दाखवली... आणि नंतर आम्ही घरी आलो .... मी विसरूनही गेले स्पर्धा वगेरे ... दुसऱ्या दिवशी सकाळ मध्ये बातमी तेजश्री पावसकरला तृतीय क्रमांक... मला आश्चर्यच वाटल... मला रांगोळी शिकवलेल्या  मैत्रिणीला किवा सभागृहाच्या मध्यभागी रांगोळी काढणाऱ्या त्या मैत्रिणीला बक्षीस नव्हत..नवल वाटल  परीक्षकांनी माझी रांगोळी बक्षीसासाठी निवडली होती... फार भारी वाटत होत होत.... प्रथम क्रमांक माझ्या शेजारी असलेल्या मैत्रिणीला जिची आई तिला मदत करत होती तिला मिळाला होता... फसवणूक केलेल्या मुलीला का बर प्रथम क्रमांक मिळाला असेल वाईट वाटल... काहीही असो मी सगळ्यात प्रथम रांगोळी काढली होती आणि मला बक्षीस मिळाल्याने माझा हुरूप तरी नक्की वाढला होता... न्यूनगंड गेला होता...पुढे जाऊन मी खुप रांगोळ्या काढल्या मला रांगोळी काढायचा नादाच लागला... आजही मी पाच बोटांची  रांगोळी शिकते आहे त्यासाठीची गोडी, आवड मला त्या रांगोळीस्पर्धेनी दिली... आणि हो आज तो तेव्हाचा माझ नाव छापून आलेला सकाळ पेपर बघितला की खुप छान वाटत.. ते शाळेतले दिवस पुन्हा यावेत असच वाटत ...                


तेजश्री 

Wednesday, May 4, 2011

दृष्टी



साधारण वेळ सायंकाळी पावणे सहाची असेल, नदीकाठालगतच्या रस्त्यावरून गाडीवरून मी जात होते.  पश्चिमेचा सुर्य बरोबर डोक्यावरून पुढे किरणे फेकीत होता. उजवीकडे नदी होती जी की अज्जीबातच बघण्यासारखी नसल्याने मी डावीकडची झाडे बघत होते. सुर्यकिरणांनी झाडांचा ऊर्ध्व भाग  सोनाळला होता, डोळ्यावर काळा गॉगल असल्याने सूर्यप्रकाशाचा भगभगीत पणा जरासा कमी झाला होता, एक वेगळीच छटा झाडांना आली होती अगदी मोहक, मी स्वतःशीच विचार करत होते आता उद्या येताना जवळ camera ठेवू आणि ह्या मनमोहक देखाव्याला छायाबद्ध करू. अर्थात हे सगळ केल तर पुढे काय करणार फार तर फार घरी येऊन दोन चार वेळा पुन्हा ती छायाचित्र बघणार अजून चार लोकांना दाखवणार झालं.. अगदी फारच एखाद खास असेल तर PC  च्या desktop वर येणारं असाही एक विचार मनात झरकन येऊन गेला एव्हाना मी आणखीन थोडी पुढे आले होते आता वाटेत दिसलेलं प्रत्येक झाडच मला छान दिसू लागल, छायाचित्रास योग्य वाटू लागल, मग त्यात केशरी फुलांचा गुलमोहोर, गुलाबी शिरीष आणि साधा पिंपळही होता. एक वेगळीच जाणीव झाली काही गोष्टी आपल्या आपल्यालाच अनुभवायच्या असतात.. त्यातला आनंद त्या छायाबद्ध किंवा शब्दबद्ध करून कधीच मिळवता येत नाही. मग आता तुम्ही म्हणाल मग हे तरी कशाला लिहील तर ते वेगळ्याच कारणांनी लिहीलय ... ते आता सांगते... आपण मराठीत काळ्या चष्मातून  बघणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ फारच नकारात्मक लावतो पण प्रत्यक्षात मात्र मी आज काळा चष्मा लावल्याने मला देखावा अप्रतीम दिसत होता, सूर्याचा भगभगीतपणा कमी झाल्याने वेगळीच छटा आली होती जी फारच मनमोहक होती. खुप आनंददायी सकारात्मक वाटत होत...   
त्याला लागुनच असाही विचार आला म्हणजे ह्या दृष्टिकोनातला फरक मुळातल्या दृष्टीत किंवा अजून विस्तृतपणे म्हणायचं तर विचारात आहे काय? त्याचा प्रत्यक्षात किवा अप्रत्यक्षात लावलेल्या चष्म्याशी संबंध नाही. प्रत्यक्षात अशासाठी की जे मला चांगल दिसलं ते दुसऱ्याला दिसेलच असं नाही आणि अप्रत्यक्षात अश्या साठी कारण काळा चष्मा लावणे ह्या वाक्प्रचारात प्रत्यक्षात डोळ्यांवर चष्मा लावणे हा अर्थ अपेक्षित नसून मुळातल्या दृष्टिकोनातला फरक असाच आहे.... 

तेजश्री

पुणे-ठाणे



दुतर्फा हिरवीगार झाडं बहरलेली होती, पांढरे पट्टे मारलेल्या काळ्या लांबसडक वळणावळणाच्या पुणे ठाणे महामार्गावरून मी पुढे सरकत होते,  झाडं, निळे शार आकाश त्यावर बेधुंद नाचणारे पांढरे, राखाडी ढग मागे मागे पळत होते. झाडांचा हिरवाच रंग पण त्यात किती छटा, कुणाचा गडद हिरवा, कोणाचा पोपटी, कुणाचा गर्द शेवाळी, तर कुणाचा पिवळसर. कसाही असला तरी मनाला सुखावणारा, आशेच बीज पेरेल असा, प्रत्येक झाडाची वेगळ्या रंगाची फुल, कुठे पिवळी धमक, कुठे सोनेरी, मधेच शेंदरी गुलमोहोर, अधून मधुन जांभळा रंगही हजेरी लावत होता, झाडांच्या शेंड्यावर पडलेल कोवळ उन झाडाला सोनेरी मुगुट घातल्यासारख शोभत होतं, जस जस ठाण जवळ आल तसा खास असा खारट वास आला आणि खाड्या दिसू लागल्या, मिठागर, मिठाचे पांढरे शुभ्र भले मोट्ठे ढीग  बघत गाडी पुढे जात होती. बगळे, कोर्मोरंटस, कुट पाण्यात मनसोक्त पोहताना दिसत होते. बुलबुल, सनबर्ड, कोकीळ ठीकठिकाणच्या झाडांवर विसावले होते, काळ्या तोंडाची वानर रस्त्याच्या बाजूला बसून वेडावत होती,  थोड्या थोड्या अंतरावरचे लांबलचक भोगदे, रुळावरून भरधाव धावणाऱ्या रेल्वे बघत बघत मी पुढे पाद्क्रमणा केली. एकीकडे निसर्गाची गीते ऐकताना निसर्गाने असा अनोखा प्रतिसाद दिला आणि निसर्गाच वास्तविक सरावाच रूप नवनिर्मिती सारख भासल.   

तेजश्री    

चाफा


हे चाफ्याचे झाडं मी खूप दिवसापासून धोपट मार्गावर बघते आहे. तुम्ही जवळून निरीक्षण केलत तर तुम्हालाही जाणवेल की ह्याचा अर्धाच  भाग पाना-फुलांनी बहरला आहे तर अर्धा पर्णहीन आहे. ह्या झाडाकडे बघताना मला आपल्या समाजवर्गरचनेची राहून राहून आठवण होते. आपल्या समाजातही असेच असते नाही, काही लोक श्रीमंत असतात, बहरलेले, सुखसोयींनी पूर्ण, ह्या झाडाच्या डाव्या अर्धांगासारखे, तर गरीब त्याच्या उर्वरीत अर्धांगाप्रमाणे सुकलेले, ज्यांना सुख सोयी तर सोडाच पण दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांती असते. किती हा विरोधाभास! आणि त्यात आपली अर्थव्यवस्था अशी आहे  की श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत आहेत गरीब अजून गरीब. समाजातली ही दोन टोक जर योग्य प्रकारे जवळ आली आणि एकमेकांना सहाय्य करू लागली तर कदाचित आजच समाजाच हे चित्र उद्या काहीस वेगळ असेल. कदाचित तेव्हा ह्या समाजरूपी झाडावर समसमान विभागलेली पान आणि फुल असतील.  फुल हे जर आपण सुख समृधीच प्रतिक मानल तर ही सुख समृद्धी सगळ्यांना मिळेल. आणि त्या वेळच ते समाजचित्र जास्त सुखावह असेल.




तेजश्री 
 

आज गोकुळात रंग खेळतो हरी...





वसंत सुरु झाला, पळस, पांगारा फुलले, आंब्याने मोहोर धरला, कोकीळा निनादू लागल्या. सर्वत्र उस्ताह आनंदाच वातावरण होत आणि त्यात भर म्हणून आज होळी होती. सार गोकुळ आनंदाने भरल होत. दरवर्षी कृष्णच आपल्याला भिजवतो, रंग लावतो, यंदा आपणच त्याला रंग लावूयात असा निश्चय राधेने केला आपल्या साख्यांसमावेत तिने लपण्याची जागा निश्चित केली. हौदात रंग कालवून तयार केला आणि हातात रंग घेऊन ती गोकुळाबाहेरच्या एका मोठ्या पाषाणामागे दडून बसली. आता थोड्यावेळात कृष्ण येईल आणि मग आपण त्याला पाठीमागून जाऊन रंग लावूयात, सार नियोजन उत्कृष्ठ होत. पाषाणामागून येणारी कृष्णाची वहिवाट स्पष्ट दिसत होती. जरी तिला सगळ दिसत असाल तरी ती मात्र  कुणाच्याही दृष्टीक्षेपात येणारं नाही ह्याची तिने खबरदारी घेतली होती. नित्य नियमाने कृष्ण गायी गुरांना घेऊन येईल मंजुळ पावा वाजवेल ह्या कल्पनेत ती बराच वेळ बसून राहिली. आता एव्हाना सुर्य मध्यान्हाला आला होता. पोटात कावळे ओरडू लागले, अजून कसा कृष्ण आला नाही एक अनामिक हुरहूर तिच्या मनात दाटली. आता कृष्ण आपल्याला विसरला तर नाही ना? आज होळी आहे हेही तो विसरला असेल का? उगाच आपण दडून बसलो, सगळ्या गोकुळात आता होळीचे रंग खेळत असतील, कृष्णाने आपल्या सख्यांना भिजवले असेल, म्हणजे दरवर्षी त्याच्या हातून सर्वप्रथम भिजून घेण्याचा आपला मान यंदा गेला? असे विचार मनात आले आणि तीच मन हळवं झालं, कितीही झालं तरी तीच कृष्णावर निस्सीम प्रेम होत. तिच्या अश्या वागण्याने कृष्ण तिला विसरून जाईल असा विचारदेखील आत्तापर्यंत तिच्या मनाला शिवला नव्हता. करायला गेलो एक आणि झालं भलतच ती झरकन पाषाणा मागून उठली. हातातला रंग एव्हाना घर्मबिंदुंनी ओला झाला होता, त्याचे ओघळ कोपरावरून खाली ओघळले होते. तिने तो रंग तसाच मातीत टाकून दिला आणि हात झटकून ती मागे वळणार इतक्यात मागून दोन रंगलेले हात तिच्या डोळ्यासमोर आले, आणि काही कळण्याच्या अगोदरच तिला संपूर्ण रंगवून टाकले. हा कृष्णच!  ज्याच्यासाठी आपण लपून बसलो तो साक्षात इथे आलाय म्हणजे तो आपल्या सख्यांबरोबर नाही, तो आपल्याला विसरलेला नाही, तिच्या डोळ्यात चमक आली, ओठांवर हसू आल, कृष्णाकडून रंग लावून घेण्यातला आनंद तिच्या रोमारोमातून उमटू लागला. ती उमलू लागली. पण दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही फसलो आपण कृष्णाला ह्या वर्षी देखील प्रथम रंगवू नाहीच शकलो ह्याची थोडीशी खंत तिच्या उरी दाटली. मातीत मिसळलेला रंग तिने उचलून झपदिशी कृष्णावर फेकला आणि गोकुळाच्या दिशेने ती धावली. एकमेकांवर मनसोक्त रंग उधळत, छेडछाड करत त्यांनी होळी साजरी केली. कृष्ण राधेची रासक्रीडा अवघ गोकुळ कौतूकान बघत होत. आज राधेला कृष्णाने रंग लावला होता. राधा कृष्णमय झाली होती. राधेच स्वतःच असं अस्तित्वच उरल नव्हत, उरला होता तो फक्त कृष्ण कृष्ण आणि कृष्णच!!!

तेजश्री            

गणपती बाप्पा मोरया


गणपती बाप्पा मोरया .... मंगलमूर्ती मोरया... ह्या गजरात अनंत चतुर्दशीची मिरवणूक सुरु आहे सगळी कडे उस्ताहाच चैतन्याच वातावरण आहे... ढोल ताशे अन असंख्य गणेशभक्त ह्यांच्या बरोबर गणपतीला निरोप दिला जातोय... माझ मन खूप समाधानी आहे त्याला कारणही तसच आहे यंदाच्या वर्षीचा हा गणपती उस्तव माझ्यासाठी फारच विशेष ठरला. गणरायाची छोटी मोठी सेवा झाली खूप छान वाटल... सर्वप्रथम गणरायाची मूर्ती साकारायला मिळाली. शाडूच्या मातीची मूर्ती साकारताना गणपती बद्दलच्या नवीन नवीन खुबी कळत गेल्या अन मी बाप्पाच्या नव्यान प्रेमात पडले. बरच काही शिकायला मिळाल हे काही थोड होत म्हणून लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या गणपतीपुढे रांगोळीची पायघडी घालण्याचा अनुभव मिळाला.. पायघडी व्यतिरिक्त पण गणरायाच्या जल्लोषात त्याच स्वागत करताना एक दांडगा उस्ताह संचारला होता ... दरवर्षी माझ्या घरी असलेल्या उस्तवात तर मी सहभागी होतेच पण हा अनुभव काही औरच होता.... आशा करते.. गणपती बाप्पा नेहमी प्रमाणे माझ्या पाठीशी असेलच आणि अशीच सेवा नेहमी करून घेईल.... गणपतीला निरोप देताना खूप वाईट वाटतंय... पण मी आता एवढच म्हणेन गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या!!!!!!!!!!

तेजश्री 

काकड आरती




कोजागिरी पौर्णिमा अत्यंत साध्या, घरगुती पद्धतीने साजरी केल्यावर आजचा काकड आरतीचा अनुभव लाजवाब होता. मुरलीधराच्या मंदिरात काकड आरतीला उपस्थित राहण्याचा प्रस्ताव कुणी मांडला आणि त्याक्षणीच मी होकार दिला. पाहटे साडे चारला उढून शुचिर्भूत होऊन पाच वाजता आम्ही घर सोडलं. जस जसे मुरलीधराचे मंदिर जवळ येऊ लागले तसे चौघड्याचे आवाज कानी येऊ लागले. देवळाबाहेर रेखाटलेली रांगोळी बघून मन प्रसंन झाले अन आम्ही देवळात प्रवेश केला. विविध वयोगटातले स्त्री पुरुष येत होते काही आधीच उपस्थित होते. काही स्त्रिया दिवा लाऊन नैवेद्य दाखवत होत्या, मग काकुनेही बरोबर आणलेला लोणी साखरेचा नैवेद्य कृष्णासमोर ठेवला, नटखट माखनचोर कृष्णाला ह्या पेक्षा सरस कोणता नैवेद्य असू शकतो असा विचार करत मी समाधानाने वंदन केले. तेवढ्यात पुजारी आले त्यानी गाभार्याच दार उघडल आणि कृष्ण राधेची द्विभुज , मानवरूपी मूर्ती आणखीन स्पष्ट दिसू लागली. गडद गुलाबी रंगाचा वेश धारण केलेला 'मुरली' धर खूपच मोहक दिसत होता मला त्याच्या मोहन ह्या नावाची अचूक प्रचीती आली. कृष्णाच्या वाम अंगाला राधा आणि चरणापासच्या दोन गाईनाही सारख्याच रंगाचा वेश होता. काकड आरती म्हणजेच काकडा हि देवाला जाग करण्यासाठी म्हणलेली प्रार्थना. अश्विन पौर्णिमेला सर्वप्रथम विठठलाच्या देवळात हा काकडा होतो त्या नंतरच्या दिवशी म्हणजे कालपासून इतर देवळातही ह्याला सुरवात होते. हि काकडारती पुढे महिनाभर रोज केली जाते. अतिषय पारंपारिक पद्धतीने शंखनाद करून ह्याला सुरवात झाली. सर्वप्रथम अत्योच्च स्वरात भूपाळू म्हणून देवाला उठवण्याचा कार्यक्रम झाला गाभाऱ्यात एक गुरुजी मंद लईत निरंजन ओवाळत होते. बाहेरच्या प्रशस्त मंडपात पुढे पुरुष आणि मागे स्त्रिया उभ्या राहून देवाला उठवण्यासाठी आर्जवत होत्या. भूपाळी पाठोपाठच काकड आरत्या सुरु झाल्या एका पाठोपाठ एक सात ते आठ आरत्या म्हणल्या. आपल्या भारदस्त आवाजात एक वयस्कर गुरुजींनी जेव्हा आरत्यांना सुरवात केली तेव्हा माझ्या मनात सहज एक विचार आला एवढ्या उच्च स्वरातल्या अर्जवता ऐकून कोणता देव उठणार नाही? टाळ, झांजा इ. वेगवेगळ्या वाद्यांनी टाळ धरला आणि मी तल्लीन झाले. एका लईत म्हटलेल्या त्या आरत्या प्रसन्न करणाऱ्या होत्या. हरेक नविन अर्तीचीची सुरुवात शंखनादाने झाली. एव्हाना गाभार्यातल्या गुरुजींनी निरांजन ठेऊन उदबत्ती घेतली होती. मंद लइत ओवाळली जाणारी उदबत्ती आणि तिचा दरवळणारा सुगंध मनमोहक होता. एक एक लोक येत होती आजूबाजूला राहणरी लोक विशेष उपस्थित होती. मुरलीधराच्या मंदिरातली ह्या वर्षीची हि पहिलीच काकड आरती असल्याने उस्ताह ओसंडून वाहत होता. विजेच्या दिव्या उजलेल्या राधा कृष्णाच्या मूर्तीला डोळ्यात साठवत आरतीची सांगता झाली. प्रदक्षिणा घालून तुळशीला नमस्कार करून आम्ही पुन्हा मंडपात आलो. कृष्णमूर्तीच्या बरोबर समोर अजून एक मंदिर आहे गरुडाच, विष्णूचे वाहन गरुद्रजालाही वंदन करून आम्ही निघालो डोळ्यात एक नविन अनुभव आणि मनात समाधान घेऊन. अश्या काकड आरतीचा आनंददायी अनुभव तुम्हीही जरूर घ्या

तेजश्री 

देवदिवाळी


                     वैकुंठ स्मशानभूमी हे नाव जरी घेतलं तरी लोक भुवया वर करतात, आणि राष्ट्रीय कला अकादमीने मात्र तिथेच जाऊन दिपोस्तव साजरा  करायचं आणि तेथे अखंड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करायचं ठरवलं. दरवर्षी हे कार्यकर्ते देवदिवाळीला न चुकता वैकुंठात दिपोस्तव साजरा करतात आणि छोटीशी का होईना पण तेथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना भेट देतात. ह्या वर्षी ह्याला १२ वर्ष झाली. यंदा मला हा सोहळा जवळून बघण्याची संधी मिळाली आणि कळून चुकल किती थोर काम करता आहेत हे सगळे कार्यकर्ते, आणि त्याच बरोबर मीही ह्यांच्यात सहभागी झाले ह्याचा अभिमान वाटला. 
                     काल सायंकाळी म्हणजे देवदिवाळीला ( मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा) आम्ही सगळे राष्ट्रीय कला अकादमीचे कार्यकर्ते वैकुंठात जमलो. वैकुंठस्मशानभूमीतील विद्युतदाहिनीजवळील मंडपात आम्ही पोहचेपर्यंत सुनील सरांनी रांगोळी रेखाटायला सुरवातही केली होती, काकस्पर्षाची कल्पना घेऊन अतिषय सुंदर रांगोळी रेखाटण्याच काम सुरु झाल होत, आम्हीही आपापल्यापरीने मदत करायला लागलो. पिंडाला तीन कावळे शिवतानाचा प्रसंग इतका जिवंत रेखाटलेला पाहून खूप छान वाटल. सकाळपासून असलेली नैराश्याची झळ दूर गेली, आधी वाटल होत कस असे तिथल वातावरण, आणि कश्या असतील तिथल्या लोकांच्या मनस्थित्या? पण तिथल उस्ताहाच वातावरण बघून चैतन्य आल, आणि भराभर कामाला लागलो. काही जणांनी बाहेरच्या प्रवेशद्वाराजवळच्या शंकराच्या मंदिरासमोर रांगोळी रेखाटावी अस ठरलं, आणि आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. कुंकू, भंडारा, हिरवा असे मोजकेच रंग घेऊन अर्धवर्तुळात सुंदर रांगोळी रेखाटली. तिकडची रांगोळी पूर्ण होईपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती, मग विद्युतदाहिनीच्या परिसरातील सगळ्या झाडांभोवतालच्या पारांवर मांडलेल्या पणत्या लावायला आम्ही कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. अवघ्या काही क्षणात तिथला परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला. पणत्या लावून आम्ही सभामंडपात आलो, एव्हाना सुनील सरांची रांगोळी पूर्ण झाली होती, त्या चित्राला अनुसरून लिहिलेली कविता हृदयस्पर्शी वाटली. 
  
' वैकुंठमय मम देह जाहला 
 दशदिन आत्मा फिरत राहिला 
 काक स्पर्श हा जेव्हा घडला 
 सर्वांचाच मग जीव भांड्यात पडला 
 तिलांजलीही मग जाहली 
 ह्या आत्म्याला मुक्ती मिळाली ' 


                     रांगोळी आणि काव्य ह्यांचा सुरेख संगम डोळ्यात साठवत आम्ही आसनस्थ झालो आणि पुढील मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. एक एक करून कर्मचार्यांना बोलावून यथोचित सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगाचे औचित्त साधून आमंत्रित मान्यवर मंडळीनी कृतज्ञता व्यक्त केली.  उदय जोशी ह्यांनी सूत्रसंचालन केले, दररोजच्या जीवनात येणारे विविध प्रसंग सांगितले आणि अंगावर काटा आला त्याचबरोबर तेथे काम करणाऱ्या लोकांच कौतुक वाटल. 
  एकदा एका नुकत्याच बाळंतीण झालेल्या स्त्रीचा देह तेथे आण्यात आला होता, बरोबरच तिच्या नवजात अर्भकाचाही देह आणण्यात आला होता मात्र त्या बालकाच्या मृत्यूच प्रमाणपत्र नातलगांजवळ नव्हत तरीही तेथील कर्मचार्यांनी तो प्रसंग योग्य प्रकारे हाताळला हे ऐकून बर वाटल, अश्या प्रसंगात दुःखी नातलग हमरीतुमरीवर येतात आणि तरीही तेथील कर्मचारी अतिषय नम्रपणे, शांतपणे प्रसंग सांभाळून घेतात हे ऐकून त्या लोकांच कौतुक वाटल. कधी कोणी नेते कुठल्या अंत्ययात्रेबरोबर येतात आणि लवकर अंत्यविधीला घेण्यासाठी विनवणी करतात मात्र येथील कर्मचारी नियमांचं काटेकोरपणे पालन करतात आणि सामान्यांना योग्य तो न्याय देतात हे ऐकून वाटल, इथे तरी राजकारण चालत नाही हे समधानकारक आहे. कधी असाही प्रसंग येतो की देहाबरोबर केवळ एकच नातलग असतो अश्या वेळी हे कर्मचारी आपुलकीनी सगळ करतात, त्या नातलगाचा शोक आवरतात , त्याला धीर देतात, हे ऐकताना अंगावर काटा आला, कश्या आणि कोणत्या प्रसंगातून इथली काम करणारी मंडळी जात असतील हे समजल तेव्हा गदबदुन आल. रात्री अपरात्री आणलेल्या मृतदेहावर अंतिमसंस्कार करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून केवळ तेथील एका कुलकर्णी नावाच्या गृहस्थांनी ते विधी शिकून घेतलेत हे ऐकल तेव्हा वाटल किती हे समर्पण आणि किती ही कामावरची श्रद्धा. असे एक ना अनेक प्रसंग ऐकताना पुन्हा पुन्हा एकच भावना येत होती, हे कर्मचारी आहेत म्हणून आज मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. हे ह्या लोकांच समाजावर असलेल ऋणच आहे.  हे समाजऋण कधीच फिटणार नाही परंतु त्यासाठी राष्ट्रीय कला अकादमीचे  कार्यकर्ते योग्य पाऊल उचलत आहेत हे पाहून खरच धन्य वाटल. अश्या ह्या विचित्र परिस्थितीत कणखरपणे काम करणाऱ्या लोकांना देवदिवाळीच्या निम्मिताने दिलेला असा हा सन्मानाचा सोहळा डोळ्यात साठवत आम्ही समाधानाने परतलो. 


तेजश्री 


७/१२/२०१०